मराठा समाजासाठी एक शब्दही उच्चारला नाही….आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सोडली; मनोज जरांगे यांची पंतप्रधान मोदींवर टीका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता मुंबईत आंदोलन करणार आहेत. 20 जानेवारीला ते मराठा समुदायासोबत मुंबईकडे येणार आहेत. त्यानंतर ते मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन करू नये, काही दिवस थांबावं आणि राज्य सरकारला वेळ द्यावा, जेणेकरून राज्य सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू शकेल, अशी विनंती राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी केली आहे. मात्र, आता मनोज जरांगे मागे हटण्यास तयार नाहीत. आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलले नाहीत, आम्ही त्यांच्याकडून आशा सोडली आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यमुळे तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांशी बातचीत करणार का असा सवाल केल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आल्याने आम्हाला काय फायदा होणार? ते मागे शिर्डीला आले होते, तेव्हाच आम्ही त्यांना आमचा विषय सांगितला होता. आम्ही मोदींना म्हटलं होतं की, तुम्ही सुरुवातीपासून सामान्यांचं नेतृत्व करत आलेले आहात. तुम्ही स्वतः सामान्यांमधून पुढे आलेले आहात. तुम्हाला सामान्यांची जाण आहे. त्यामुळे तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या. राज्य सरकारला सांगा की, मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्या. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन टाका. आम्ही आमचे मुद्दे त्यांना सांगितले होते. परंतु, त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते दोन वेळा महाराष्ट्रात येऊन केले. परंतु, त्यांनी काही केलं नाही.

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आले, त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्यांना सामान्यांची आता गरज उरली नाही, त्यांच्याशी आमचं देणंघेणं नाही. आम्हाला वाटायचं त्यांना या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आहे. त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले असते. खरंतर मराठा आरक्षण हा केंद्राच्या अधिकारातला विषय नाही. तो राज्य सरकारचा विषय आहे. परंतु, राज्यात एवढं वातावरण ढवळून निघालं आहे, त्यावेळी त्यांनी हस्तक्षेप करणं आवश्यक होतं. त्यांनी राज्य सरकारला सांगायला हवं होतं की, मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका पण त्यांनी काहीही केले नाही.

आम्ही हा जो काही लढा देत आहोत तो आजचा लढा नाही. हे रान एका दिवसात ढवळून निघालेलं नाही. गेल्या चार-पाच पिढ्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळे मोदींनी राज्य सरकारला सांगायला हवं होतं की, मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. परंतु, दोन शब्द वापरायला त्यांना कसली अडचण होती. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पंतप्रधानांनी त्यासाठी एखादा शब्द काढणं अपेक्षित होतं. परंतु, त्यांनी मराठा समाजासाठी एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सोडून दिली आहे. तुम्ही महाराष्ट्रात या किंवा आणखी कुठेही या, मराठ्यांनी आता तुमच्याकडून आशा सोडली आहे. ज्यांना आशा असेल त्या मराठ्यांनीदेखील ही आशा आता सोडावी, असेही जरांगे पाटील म्हणाले.