संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष आक्रमक होत केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मणिपूरमधील एका घटनेचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही. संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे, हीच आमची मागणी आहे, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर टीका केली. यानंतर प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमधून त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जरा सोचिए कि मणिपुर हिंसा में मारे गए लोगों को आठ महीने बाद जाकर दाह संस्कार नसीब हुआ। मणिपुर को लेकर जब संसद में सवाल पूछे गए तो सरकार ने जिम्मेदारी लेने की जगह अनर्गल जवाब दिए।
अब तो वह संसद भी सुरक्षित नहीं रही, जिसमें प्रधानमंत्री खुद बैठते हैं, लेकिन सवाल पूछने पर करीब 150… pic.twitter.com/JEG49NERtt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 21, 2023
प्रियंका गांधी यांनी मणिपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर नातेवाईक अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. जरा विचार करा की, मणिपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांवर आठ महिन्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूरबाबत संसदेत प्रश्न विचारला असता, सरकारने जबाबदारी घेण्याऐवजी विसंगत उत्तरे दिली. आता खुद्द पंतप्रधान ज्या संसदेत बसतात ती संसदही सुरक्षित नाही, तर सुमारे दीडशे खासदारांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या राजवटीत संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.