सामना अग्रलेख – काशी कलंकित झाली

भारतीय जनता पक्ष संस्कृती, नैतिकता अशा मुद्दय़ांवर रोजच प्रवचने झोडत असतो. पण काशी बलात्कार कांडावर त्यांनी मौन बाळगले. कारण नराधम हे हिरव्या लुंगीतले नसून डोक्यावर काळी टोपी खांद्यावर भगवे उपरणे टाकून भाजपच्या अंधभक्तांचे नेतृत्व करणारे आहेत. बनारस हिंदू विद्यापीठास कलंकित करण्याचे काम भाजपच्या भक्त मंडळींनी केले. त्याचे प्रायश्चित्त कसे करणार? काशीचे महत्त्व हे पुण्यप्राप्तीसाठी पापाचे परिमार्जन करण्यासाठी आहे. इथे अंधभक्तांच्या टोळक्याने काशी कलंकित केली. गंगा तरी काय करणार? यांची पापे कशी धुणार?

भारतीय जनता पक्षाच्या ढोंगबाजीवर कुणीतरी संशोधन करून ‘पीएचडी’ मिळवायला हवी. पंतप्रधान मोदी प्रतिनिधित्व करीत असलेल्या वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये एका मुलीवर सामुदायिक बलात्काराचे कांड घडले. हे बलात्कार कांड दोन महिन्यांपूर्वी घडले, पण संबंधित गुन्हेगारांना आता म्हणजे दोन महिन्यांनी अटक झाली व अटक झाली तरी त्या नराधमांना कठोर शिक्षा होण्याची ‘गॅरंटी’ नाही. कारण बलात्कार कांडातील तीनही आरोपी भाजपच्या ‘आयटी सेल’चे मुख्य पदाधिकारी असून त्यांचे संघ शाखेवर नियमित जाणे-येणे आहे. हे बलात्कारी ‘संघ’ परिवाराशी नात्यात असल्याने दोन महिने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबावर दबाव आणून, आमिषे दाखवून प्रकरण रफादफा करण्याची योजना तथाकथित हिंदू संस्कृती रक्षक व दक्षक अमलात आणू शकले नाहीत. चार राज्यांतील निवडणुकांवर या बलात्कार कांडाचा परिणाम होईल असे वाटल्याने दोन महिने चालढकल केली व आता गुन्हा दाखल केला व आरोपींना अटक केली. कुणाल पांडे, सक्षम पटेल व अभिषेक चौहान अशी त्या आरोपींची नावे आहेत. त्यातील एक जरी आरोपी अल्पसंख्याक समुदायाचा असता व खास करून मुसलमान असता तर भारतीय जनता पक्षाने राममंदिर उद्घाटनाआधीच धार्मिक काहूर माजवले असते. अंजना ओम कश्यप, चित्रा त्रिपाठी, श्वेता सिंह, अर्णब, रुबिका लियाकत, आदिती त्यागी वगैरे न्यूज अँकर्सनी आपल्या वाहिन्यांच्या छोटय़ा पडद्यांवर न्यायालयाचा सेट लावून त्या आरोपीना

एव्हाना फासावर

लटकवले असते. पण बनारस हिंदू विद्यापीठात इतके मोठे बलात्कार कांड घडूनही या ‘अँकर्स’ कोमात गेल्या आहेत व त्यांच्या वाहिन्यांवर याप्रकरणी सन्नाटा आहे. कारण पीडित महिला हिंदू आहे व बलात्कार करणारे भाजपचे पदाधिकारी आहेत. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी, डॉ. जे. पी. नड्डा, स्मृती इराणी अशा मंडळींशी जिव्हाळा व जवळीक आहे असे स्पष्ट करणारी त्या बलात्काऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या संघ स्वयंसेवकांनी हिंदू विद्यापीठात, काशी नगरीत, मोदींच्या प्रिय वाराणसी नगरीत एका अबलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढले व संपूर्ण भारतीय जनता पक्षाची त्यामुळे वाचाच गेली. हे प्रकरण एखाद्या गैरभाजपशासित राज्यात घडले असते तर भाजपच्या बजरंगी फौजांनी तेथे कूच केले असते व पाठोपाठ गृहमंत्री अमित शहादेखील तेथे पोहोचले असते. पण आता सगळाच सन्नाटा आहे. हा सन्नाटा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल, अभिषेक चौहान हे संघवीर वाराणसी भाजपच्या ‘आयटी सेल’चे संयोजक आहेत. ही एक प्रकारची भाजपची ‘गोबेल्स सेना’ आहे. प्रत्येकी दोन-दोन रुपये दराने एखाद्याच्या विरोधात बदनामीचे संदेश पाठवण्याचे काम ही गोबेल्स सेना करते व त्याच चिखलातून उपजलेल्या या तिघांनी वाराणसीत बलात्कार कांड केले. देशात द्वेष, खोटारडेपणा, धर्मभेद पसरविण्याचे काम हेच लोक करतात. राजकारणातील प्रमुख नेते – मग ते राहुल गांधी असोत, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू यादव असोत – त्यांच्या विरोधात अपप्रचार आणि अफवा पसरवण्याचे काम हेच

सडक्या डोक्याचे लोक

करतात. हिंदुत्वास बदनाम करण्याचा अपराध करणारे हेच लोक आहेत व त्यातल्याच संघवीरांनी काशी नगरीत अधम कृत्य केले आहे. एका बाजूला अयोध्येत हिंदुत्वाचे नगारे वाजवले जात आहेत व त्याच वेळी काशी नगरीतील बलात्कार कांड दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. बलात्कारी अन्य धर्माचा असता तर एव्हाना योगी महाराजांचा बुलडोझर त्याच्या घरादारांवरून, संपूर्ण वस्तीवरून फिरला असता व हिंदूंच्या रक्षणकर्त्याचा आव आणून भक्तांनी त्या बुलडोझरवर चढून भाषणे दिली असती. पण इतके मोठे दुर्योधनी दुष्कर्म घडूनही भाजप आता जणू विपश्यनेला बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे खरे चालचरित्र हेच आहे. मणिपुरातील महिलांची नग्न धिंड काढून शोषण करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील शोषणाविरोधात आवाज उठवला. पद्मश्री, खेलरत्न पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या दारात ठेवून निषेध केला तरीही मोदी गप्प बसले. बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना मुक्त करून त्यांची विजय यात्रा काढण्यात आली. त्यावरही भाजपने साधे भाष्य केले नाही. भारतीय जनता पक्ष संस्कृती, नैतिकता अशा मुद्दय़ांवर रोजच प्रवचने झोडत असतो. पण काशी बलात्कार कांडावर त्यांनी मौन बाळगले. कारण नराधम हे हिरव्या लुंगीतले नसून डोक्यावर काळी टोपी व खांद्यावर भगवे उपरणे टाकून भाजपच्या अंधभक्तांचे नेतृत्व करणारे आहेत. बनारस हिंदू विद्यापीठास कलंकित करण्याचे काम भाजपच्या भक्त मंडळींनी केले. त्याचे प्रायश्चित्त कसे करणार? काशीचे महत्त्व हे पुण्यप्राप्तीसाठी व पापाचे परिमार्जन करण्यासाठी आहे. इथे अंधभक्तांच्या टोळक्याने काशी कलंकित केली. गंगा तरी काय करणार? यांची पापे कशी धुणार?