डूप्लिकेट प्रधानमंत्री आपल्याला घरी पाठवायचा आहे; संजय राऊत यांचं दणकेबाज भाषण

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. नाशिकमध्ये प्रचंड उन्हाळा जाणवत असताना या रॅलीसाठी जनतेत उत्साह दिसत होता. या रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी देशातील डुप्लिकेट प्रधानमंत्री आपल्याला घरी पाठवायचा आहे, असा घणाघात भाजपवर केला. तर राज्यात महाविकास आघाडीचाच विजय होणार असा ठाम विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर राजाभाऊ वाजे यांच्याविरोधात लढण्यासाठी महायुतीला उमेदवराच मिळत नसून राजाभाऊ वाजे यांना महायुती घाबरल्याचे दिसत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यश्र जयंत पाटील यांनी लगावला.

नरेंद्र मोदी म्हणतात, ही नकली शिवसेना आहे. हिंमत असेल तर समोर या. काय नकली आहे आणि काय असली आहे, हे 4 जूनला आपल्याला दाखवायचे आहे. हा लढणारा महाराष्ट्र आहे, आमच्या नादाला लागू नका, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आम्हाला आडवे येऊ नका, असेही त्यांनी ठणकावले.

आपण आपली विराट शक्ती विरोधकांना आणि महाराष्ट्राला दाखवली आहे. देशातील सगळ्यात विशाल रॅली नाशिकमध्ये निघाली आहे. देशातील हुकूमशाहीविरोधात जनता एकवटली आहे. आपल्याला देशातील हुकूमशाही नष्ट करायची आहे. तसेच देशातील डुप्लिकेट, नकली पंतप्रधान आपल्याला घरी पाठवायचा आहे आणि आपण ते करणारच आहोत, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

नाशिकसह, दिंडोरी, धुळे, जळगाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या लाटेमध्ये उसळत आहे. त्यात आपला भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. आता देशातू हुकूमशाही उलथवून लावण्यासाठी पुढचे 15 दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे 15 दिवस आपल्याला जागे राहून सतर्क राहायचे आहे. या महारॅलीतून राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार याबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रचंड ऊन असतानाही या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा हा प्रतिसाद पाहता राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजयी होणार असा विश्वास आहे. तसेच निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आपल्याला मोठा विजय मिळवायचा आहे आणि त्यानंतर आपली विजयाची अशीच भव्य रॅली काढण्यात येईल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

जनतेचा हा उत्साह बघून राजाभाऊ वाजे निवडून आले आहेत आणि ही विजयी मिरवणूक आहे, असे वाटते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या मागे उभा आहे. महाराष्ट्रात भाजपची एकही जागा जिंकून येणार नाही, आलेच तर फक्त नितीन गडकरी विजयी होऊ शकतात. इतर महाराष्ट्रात भाजपला एकही जागा मिळणार नाही. भाजपविरोधात जनतेत रोष आहे. सरकारला नाशिकचा कांदा दिसला नाही. त्यांना गुजरातचा कांदा दिसला. त्यामुळे हा निर्णय घेत सरकारने जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे. त्यामुळे जनतेने भाजपविरोधात मतदान करण्याची गरज आहे. राजाभाऊ यांचा प्रभाव एवढा आहे की, त्यांच्याविरोधात उमेदवारच सापडत नाही. आपल्या आघाडीला आणि राजाभाऊ वाजे यांना महायुती घाबरल्याचे दिसून येत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.