नामनिर्देशनपत्र फेटाळण्याच्या विरोधातील सर्वच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने विचार करण्यास सुरुवात केल्यास मोठा गोंधळ उडेल, असे मत खंडपीठाने आज नोंदवले. अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळलेल्या एका बिहारी व्यक्तीने याविषयी केलेली याचिका फेटाळताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले. नामनिर्देशनपत्र नाकारल्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणे हा योग्य मार्ग असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले. तथापि, खंडपीठाने अपक्ष उमेदवार जवाहर कुमार झा यांना योग्य ते कायदेशीर मार्ग अनुसरण्याची मुभा दिली.