मुलगा झाला, पेढे वाटले; तीन दिवसांनी मुलाला पोलीस घेऊन गेले

बदलापूर येथील आजगावकर दाम्पत्याला बरीच वर्षे झाली तरी अपत्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी बाळाला दत्तक घेण्यासाठी खटाटोप सुरू केला. दरम्यान, आम्हाला बाळ होणार असे त्यांनी सर्वांना सांगितले आणि नऊ महिन्यांनंतर त्यांच्या घरी गोंडस मुलगा आला. मुलगा झाल्याने आजगावकरांनी पेढे वाटले. घरात आनंदाचे वातावरण होते, पण हा त्यांचा आनंद क्षणिक ठरला. तीन दिवसांनी रेल्वे पोलीस त्यांच्या घरावर धडकले आणि त्यांना विकलेले ते बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. बेघर दाम्पत्याच्या दोन महिन्यांच्या मुलाचे नाटय़मयरीत्या अपहरण आणि विक्री झाली होती. अखेर रेल्वे पोलिसांनी अपहरणनाटय़ावर पडदा पाडला.

एक बेघर दाम्पत्य बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात राहते. 17 तारखेला ते स्थानकाला लागून असलेल्या फुटपाथवर झोपलेले असताना पहाटे त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा गायब झाला. मुलाच्या आईला जाग आल्यानंतर बाळ जवळ नसल्याचे पाहून ती हादरलीच. तिने तत्काळ बोरिवली रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून बाळाचा शोध सुरू केला. बोरिवली पोलिसांबरोबर गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमराज साठे, उपनिरीक्षक बाळकृष्ण चव्हाण, दीपक शिंदे व पथकाने अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने शोध घेत असताना अपहरणकर्ता जोगेश्वरी येथे असल्याचे समजले. मग त्याचे लोकेशन गोवंडीत दाखवले. त्यानंतर तो पुणे रेल्वे स्थानकात असून तो इलाहाबादला पळण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने आलम आब्बास काशीम शेख ऊर्फ राजा (22) याला पकडण्यात आले. राजाची कसून चौकशी केल्यावर त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली देत त्या बाळाला बदलापूर येथील आजगावकर दाम्पत्याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आजगावकरांचे घर गाठले आणि त्यांना या बाळाचे अपहरण झाले असून ते तुम्हाला विकण्यात आले असल्याचे सांगून पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले. उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी त्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले.

लग्नाचा खर्च काढण्यासाठी बाळाची चोरी
आलम शेख ऊर्फ राजा याला लग्न करायचे होते. पण त्यासाठी त्याला पैसा जमवायचा होता. त्यात सय्यदने एखादे बाळ मिळते का बघ असे त्याला सांगितले होते. त्यामुळे राजाच्या डोक्यात नको तो विचार घोंगावू लागला. तो सर्वत्र लहान बाळ कुठे आहे का ते शोधू लागला. अखेर बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात त्याच्या नजरेस दोन महिन्यांचा मुलगा पडला. त्याने शिताफीने मुलाच्या पालकांशी ओळख वाढवली. दोन दिवस त्यांना पैसे दिले व त्यांची मदत केली आणि 17 तारखेच्या पहाटे मुलाला उचलून पोबारा केला.