मी इथे दु:खी आहे, मला परत हिंदुस्थानात जायचंय! अंजूची रडारड सुरू

हिंदुस्थानातून अधिकृत व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पुन्हा हिंदुस्थानात परतायचे आहे. अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती इथे तिच्या मित्राला फक्त भेटण्यासाठी आली आहे, मात्र ती नसरुल्लाशी गुपचूप लग्न करून मोकळी झाली होती. तिची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर तिने पाकिस्तानात जाऊन लग्न केल्याचे कळाले होते. अंजूने नसरुल्लाशी लग्न करण्यासाठी तिचा धर्मही बदलला आहे. मात्र आता हीच अंजू दुःखी असल्याचं सांगितलं जात आहे.

बीबीसी पाकिस्तानने याबाबतचे वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की अंजू दुःखी झाली आहे. तिने म्हटलंय की ‘ येथे (पाकिस्तान) सर्व काही चांगलं आहे. मी थोडे वेगळे नियोजन करून इथे आले होते, पण मला जे वाटत होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच घडलं. माझ्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. इथे जे काही घडले त्यामुळे माझ्या हिंदुस्थानातील कुटुंबाचा अपमान झाला आहे. हे सर्व माझ्यामुळे घडले आहे , त्यामुळे मी खूप दुःखी आहे. दुसरे म्हणजे मुलांच्या मनात माझ्याबद्दल कोणती प्रतिमा निर्माण झाली असेल याची मला काळजी वाटते आहे.

‘मला परत जायचे आहे’

अंजू पुढे म्हणाली , ‘ मला कोणत्याही मार्गाने मायदेशी जायचे आहे आणि मी तिथे जाऊ शकते. मी प्रत्येक गोष्टीचा सामना करायला तयार आहे. मी तिथल्या माध्यमांनाही सामोरे जायला तयार आहे. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरे आहेत. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही, हे मी त्यांना सांगेन. माझी खूप चांगली काळजी घेतली गेली. पाकिस्तानात जाऊन नसरुल्लाशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा होता. मीडियाच्या दबावामुळे मी लवकर परत जाऊ शकत नाहीये. मला आता माझ्या मुलांची आठवण यायला लागली असून मला एकदा माझ्या मुलांना भेटायचे आहे.

अंजूचा व्हिसा वाढवला नाही

पाकिस्तानने अंजूचा व्हिसा वाढवला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अंजूचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाने मात्र याचा इन्कार केला आहे. नसरुल्लाह याने म्हटलंय की अंजूच्या व्हिसाची मुदत वाढावी यासाठी अर्ज केला आहे, मात्र अद्याप ही मुदत वाढवून मिळालेली नाही. व्हिसाची मुदत वाढली नाही तर अंजूला पाकिस्तानातून परत हिंदुस्थानात पाठवण्यात येईल.