कोणत्याही पक्ष, संघटना फोडणं हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम! राजू शेट्टींची टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे पक्षसंघटना सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाविषयी आणि कार्यपद्दतीबद्दल काही आक्षेप घेतले होते. राजू शेट्टी यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले, मात्र त्यांनी त्यावर काहीही केलं नाही असा आरोप तुपकर यांनी केला आहे. तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजेची वेळ दिली होती. मात्र तुपकर यांनी या समितीपुढे जाणं टाळलं. तुपकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असून याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, शेतकरी माझा आत्मा आहे. कपोलक्लपित बातम्या माझ्याबद्दल पसरवण्यात येत आहे. या अफवा आता थांबवायला हव्यात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी या घडामोडींबाबत बोलताना म्हटले की, पक्षांची फोडाफोड करणे हा भाजपचा अधिकृत कार्यक्रमच झाला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत भाजपने हेच केलं होतं. असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तुपकरांसंदर्भात ज्या अर्थी इतक्या झटपट प्रतिक्रिया येते ती ऐकून यामागे भाजप असावं असा संशय घ्यायला जागा आहे असे शेट्टी यांनी म्हटले आहे.