सामना अग्रलेख – आकडय़ांचा भुलभुलैया! परकीय गुंतवणुकीचा सातबारा

परकीय गुंतवणुकीच्या सोंगटय़ा फेकून तुम्हाला ना बनवाबनवीचा जुगार जिंकता येईल, ना महाविकास आघाडी सरकारचे श्रेय लाटता येईल, ना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यावरून तुमच्याबद्दल असलेला जनतेच्या मनातील रोष कमी होईल. आकडय़ांचा ‘भुलभुलैया’ तुम्हाला करायचाच असेल तर ती तुमची मर्जी. परकीय गुंतवणुकीचा सातबारा फक्त आमच्याच नावावर ही कुऱ्हाड स्वतःच स्वतःच्या पायावर मारून घ्यायची असेल तर तीदेखील तुमची मर्जी. महाराष्ट्रातील जनता सगळे ओळखून आहे. बाकी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात नंबर वन व्हायला हवा. फक्त ‘गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास’ असे मानणाऱ्या तुमच्या श्रेष्ठींना ते मान्य होईल का, तेवढे बघा!

महाराष्ट्राच्या परकीय गुंतवणुकीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा ‘नंबर वन’ बनला आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे आकडय़ांच्या सोंगटय़ा जनतेसमोर फेकल्या आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य बनले आहे, असे ‘सीनियर’ उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीतील या गुंतवणुकीचा आकडा म्हणे, 28 हजार 868 कोटी रुपये आहे तर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील गुंतवणूक 65 हजार 502 कोटी रुपये इतकी आहे. शिवाय महाराष्ट्रातील ही परकीय गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि तेलंगणा या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही जास्त आहे, असा ‘56 इंची’ दावादेखील फडणवीस यांनी केला आहे. या सरकारचे सध्या फक्त एकच काम सुरू आहे ते म्हणजे, आमच्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राची गाडी सर्वच बाबतीत कशी वेगाने पळत आहे. त्याबद्दल वेगवेगळे दावे करणे, घोषणांचे पोकळ फुगे हवेत सोडणे. फक्त आमचे सरकारच कसे चांगले काम करीत आहे आणि आधीचे सरकार कसे काम करीत नव्हते, हाच आटापिटा त्यांचा सुरू असतो. वस्तुस्थिती तशी नसली तरी आधीच्या सरकारने केलेला ‘मावा’ झाकून ठेवायचा आणि त्याचेही श्रेय आपणच घ्यायचे हा ‘नागपुरी कावा’ सध्या जरा जास्तच सुरू आहे. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचा जो काही

डंका उपमुख्यमंत्र्यांनी

पिटला तो याच पठडीतला आहे. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढली असेल तर कोणाला दुःख होणार आहे? महाराष्ट्र देशात अव्वल झाला असेल तर वाईट वाटण्याचे कारण काय? किंबहुना, फक्त परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात ‘नंबर वन’चे राज्य असावे असेच सगळय़ांना वाटते. प्रश्न इतकाच आहे की, ही गोष्ट आकडय़ांच्या सोंगटय़ा फेकून साध्य कशी होईल? महाराष्ट्रात जी काही परकीय गुंतवणूक मागील काही काळात झाली त्याचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर खुशाल घ्या, परंतु त्यात बनवाबनवी कशाला करीत आहात? स्वतःला नेहमी ‘पारदर्शी’ वगैरे म्हणवता ना, मग परकीय गुंतवणुकीचा तपशील, कालावधी याबाबतीतही पारदर्शक राहा. तुम्ही राज्यातील परकीय गुंतवणुकीचा जो कालखंड आता दिला आहे त्यातील 15 महिने राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार होते. महाराष्ट्रातील वाढत्या परकीय गुंतवणुकीचे श्रेय महाविकास आघाडी सरकारचेही आहे हेदेखील लक्षात असू द्या. वास्तविक, त्या वेळी तर कोरोना महामारीमुळे एकूणच आर्थिक-औद्योगिक आणीबाणीची परिस्थिती होती. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात (2021-22) राज्यात 15 हजार 439 दशलक्ष डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली होती. मात्र तुमच्या काळात परकीय गुंतवणूक किती आली? तर 14 हजार 106 दशलक्ष डॉलर्स! तीदेखील कोरोना जाऊन एक वर्ष सरलेले असताना. म्हणजे तुमच्यापेक्षा

महाविकास आघाडी सरकार

राज्यातील परकीय गुंतवणुकीबाबत अव्वल होते. हे तुम्ही मान्य करीत नसला तरी तुम्हीच दिलेले आकडे त्यातील सत्य सांगत आहेत. मागील तीन वर्षांतील महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ‘आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक देशात नंबर वन झाली हो S S’ हे तुणतुणे तुम्ही कुठल्या तोंडाने वाजवीत आहात? मात्र माझे ते माझे आणि दुसऱ्याचे तेही माझे असा हडेलहप्पी कारभार राज्यात सुरू आहे. परकीय गुंतवणुकीबाबत तुम्हाला स्वतःची पोकळ छाती फुगवायचीच असेल तर खुशाल फुगवा, पण राज्यातील उद्योग क्षेत्र ‘मोडीत’ काढून येथील उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या दिल्लीकरांच्या विरोधातही छाती पिटा! परकीय गुंतवणुकीच्या सोंगटय़ा फेकून तुम्हाला ना बनवाबनवीचा जुगार जिंकता येईल, ना महाविकास आघाडी सरकारचे श्रेय लाटता येईल, ना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यावरून तुमच्याबद्दल असलेला जनतेच्या मनातील रोष कमी होईल. आकडय़ांचा ‘भुलभुलैया’ तुम्हाला करायचाच असेल तर ती तुमची मर्जी. परकीय गुंतवणुकीचा सातबारा फक्त आमच्याच नावावर ही कुऱ्हाड स्वतःच स्वतःच्या पायावर मारून घ्यायची असेल तर तीदेखील तुमची मर्जी. महाराष्ट्रातील जनता सगळे ओळखून आहे. बाकी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात नंबर वन व्हायला हवा. फक्त ‘गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास’ असे मानणाऱ्या तुमच्या श्रेष्ठींना ते मान्य होईल का, तेवढे बघा!