राज्य सरकारचं शासकीय कामकाज चालणाऱ्या मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या मजल्यावर जाळी लावल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. याच घटनेवरून काँग्रेस नेते संजय निरूपमयांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आत्महत्या रोखण्याऐवजी जाळ्या लावण्यात मग्न आहे, असा टोलाही निरुपम यांनी लगावला आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचं मुख्यालय असलेलं ठिकाण म्हणजे मंत्रालय आहे. महाराष्ट्रात हे ठिकाण आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक येतात आणि सरकारच्या धोरणांना कंटाळून इमारतीच्या गच्चीवरून किंवा सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव देतात. अशा घटनांमध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे. सरकार मात्र आत्महत्या रोखण्याऐवजी मंत्रालयात जाळ्या लावण्यात मग्न आहे. जाळी लावण्यात आल्याने कुणी उडी मारली तरीही ती व्यक्ती त्यात अडकते आणि त्याचा जीव वाचतो. मंगळवारीही एका युवकाने मंत्रालयातून उडी मारली. मात्र तो या जाळीत अडकला आणि त्याचा जीव वाचला, असं निरुपम म्हणाले.
महाराष्ट्र सरकार का मुख्यालय यानी मंत्रालय।
यह प्रदेश का कुख्यात आत्महत्या प्वाइंट है।
अक्सर यहाँ सरकार की नीतियों से त्रस्त लोग आते हैं और बिल्डिंग के ऊपर चढ़कर जान देने के लिए कूद जाते हैं।
इसमें कई लोगों की जान जा चुकी है।
सरकार ने आत्महत्या की मजबूरियों को दूर करने के बजाय… pic.twitter.com/kKbJ87io6i— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 27, 2023
ते पुढे म्हणाले की, मंगळवारी जी घटना घडली त्यात जर तरुणाचा जीव गेला असता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छी थू झाली असती. मूळ प्रश्न हा आहे की तरुण किंवा त्रस्त लोक आत्महत्या करण्यासाठी का प्रवृत्त होत आहेत? महाराष्ट्रातल्या मंत्रालयातूनच उडी घेऊन ते का आयुष्य संपवू पाहतात? याबाबत सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फोडाफोडी करायची, सरकार पाडायचं, दुसरं सरकार आणायचं यातच पक्ष व्यग्र राहू लागल्याने या गोष्टी घडत आहेत. अशा लोकांना युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याकडे लक्ष द्यायला कुठून वेळ असणार आहे? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सरकारने दिलासा दिला पाहिजे. सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा नियमितपणे घेतल्या गेल्या पाहिजेत. बेरोजगारीचे चटके सोसणाऱ्या तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे आणि यावर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पक्षचिन्ह पळवायचं, आमदारांना अपात्रतेपासून वाचवण्यासाठी जुगाड करायचे हे सगळं होईल. पण लाज कशी वाचवणार? या आशयाची पोस्ट करून निरूपम यांनी सरकारवर कडाडून टीका केली.