जयंत पवार लिखित ‘अधांतर’ नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड. यामध्ये गिरणी संपाने पिचलेल्या मराठी कुटुंबाची व्यथा दाखवण्यात आली. या वास्तववादी नाटकाला 25 वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने 8 ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़मंदिरात विशेष कार्यक्रम होणार असून ‘अधांतर’च्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत.
दुपारी 2.30 ते 5.30 दरम्यान ‘अधांतर’ (हिंदी) नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण व अभिवाचन होईल. ‘अधांतर’ मराठी या नाटकातील मूळ संचातील कलाकार संजय नार्वेकर, लीना भागवत, अनिल गवस, आशीष पवार, हेमंत भालेकर, सविता मालपेकर, राजन भिसे यांच्याशी मुपुंद कुळे संवाद साधतील.
‘अधांतर ः भूमी व अवकाश’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथाचे संपादक राजू देसले यांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी एम. के. रैना, विश्वास ठाकूर उपस्थित राहतील. कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता होईल. कवी, लेखक रवींद्र लाखे, प्रवीण बांदेकर, कवी किशोर कदम, पत्रकार समर खडस, लेखिका संध्या नरे–पवार, लोकवाङ्मयगृहचे राजन बावडेकर, ‘अधांतर’ मराठीचे दिग्दर्शक मंगेश कदम, ‘अधांतर’ हिंदीचे दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड प्रमुख वक्ते आहेत.