
खरीप हंगामात बियाण्यांच्या उगवण क्षमतेसह खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासणी करून अहवाल अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या तक्रार नियंत्रणासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीजच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वस्तुनिष्ठ तपासणी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.




























































