भाजपने महाराष्ट्राचं अन् देशाचं राजकारण सुडाचं आणि गलिच्छ केलं; सुप्रिया सुळेंची जोरदार टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सभा घेतल्या जात आहेत. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच बारामती मतदारसंघातील प्रश्नांवरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवर (X) व्हिडिओ प्रसारीत करून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की,”बारामतीमध्ये भाजपचं एकचं ध्येय आहे, शरद पवारांना हरवणे. विकासाचे काही मुद्दे नाहीत. आज बारामतीमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. टँकरची आणि छावण्यांची गरज आहे. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, टँकरचा, शेतीचा ना हमीभावाचा हा एकही मुद्दा त्यांनी मांडलेला नाही. भारतीय जनता पक्षाचं एकचं लक्ष्य आहे. ते म्हणजे आदरणीय शरद पवारांना हरवणे. हे एकचं त्याचं टार्गेट आहे. हे खूप दुर्दैवी असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

भाजपने राजकारण गलिच्छ केलं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. त्या पुढे म्हणाल्या की, हा छत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा, कै. यशवंतराव चव्हानांचा महाराष्ट्र आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. दुर्दैवं आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण भारतीय जनता पक्षाने सुडाचं आणि गलिच्छ केलं आहे. ते म्हणतात विकास विकास. पण विकासाचा मुद्दाच राहिलेला नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.