महाराष्ट्राचा मणिपूर, मध्य हिंदुस्थानवर विजय

56 व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्रने मणिपूरचा, तर महिला गटात दुसऱया सामन्यात मध्य हिंदुस्थानचा पराभव करत साखळी सामन्यात वर्चस्व राखले.

दिल्ली येथील पहारगंज येथील करमाळी सिंग क्रीडांगण येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात रंगलेल्या पुरुष गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्रकडून ऋषिकेश मुर्चावडे (1.50 मि. संरक्षण), प्रतीक वाईकर (2 मि. संरक्षण व 1 गुण), ऋषभ वाघ 2.40 मि. संरक्षण व 1 गुण), सौरभ घाडगे (3 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर आक्रमणात महाराष्ट्राने 15 गुण मिळवले. मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राकडे (15-5) 10 गुणांची आघाडी होती. दुसऱया डावात निखिल सोडिये (2 मि. संरक्षण), अक्षय भांगरे (1.40 मि. संरक्षण), विजय शिंदे (1.30 मि. संरक्षण), अक्षय मासाळ (1.40 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्राला (30-20) एक डाव 10 गुणांनी विजय मिळवून दिला. मणिपूरतर्फे धनंजय (1 मि. संरक्षण व 2 गुण) याने चांगला खेळ केला. साखळीमध्ये ‘ब’ गटात महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली आहे.

महिलांच्या ‘अ’ गटातील दुसऱया सामन्यात महाराष्ट्राने मध्य हिंदुस्थानवर (40-10) एक डाव 30 गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (4 मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (2.20 मि. संरक्षण व 8 गुण), काजल भोर (3.40 मि. संरक्षण व 8 गुण), गौरी (2.40 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी दमदार खेळ करत चांगला खेळ केला. मध्य हिंदुस्थानकडून सेजल (1 मि. संरक्षण) व रोहिणी (4 गुण) यांनी चांगला खेळ केला.