Election 2024 – रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्र रद्द

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिले आहे.

रश्मी बर्वे यांनी 2020 वडिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र बनवले होते. मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र बनवताना देण्यात आलेले वडिलांचे शैक्षणिक कागदपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. राज्य सरकारने 22 मार्चला याप्रकरणी आदेश काढत चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी जिल्हा जात पडताळणी समितीचे अधिकारी गेल्या तीन-चार दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर गुरुवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांच्या घरावर एक नोटीस चिटकवली आणि 10 वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतरही रश्मी बर्वे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय घेत रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले.

रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निर्णय राखून ठेवला असून सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, रश्मी बर्वे यांनी याप्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राजकीय आकसापोटी आपल्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रामटेक, अमरावती, कोल्हापूर आम्ही हसतहसत काँग्रेसला दिले; सांगलीवरून कटूता नको! – संजय राऊत

अर्ज होऊ शकतो बाद

दरम्यान, रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्जही बाद होऊ शकतो. काँग्रेसचे नेते किशोर गजभिये यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अनेक दशकं सनदी अधिकारी राह्लायमुळे आणि जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे असे वाटतं की रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो, असे ते म्हणाले.