भाजपला देशवासीयांना गुलाम बनवायचे आहे; अलिबागमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा

विरोधकांना संपवून भाजपला देशात एकहाती सत्ता स्थापन करायची आहे. एकदा का हुकूमशाही राजवट आली की जनतेला ते गुलामासारखे वागवतील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार संजय पोतनीस यांनी दिला. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबागच्या शेतकरी भवन येथे प्रमुख पदाधिकाऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय पोतनीस यांनी भाजपच्या बकासुरी वृत्तीवर टीकेची झोड उठवली. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली संविधान बदलून भाजपला स्वतःच्या मर्जीतील सत्ता राबवायची आहे. यासाठीच त्यांनी चारशे पारचा नारा दिला आहे. मात्र भाजपचा हा डाव देशातील जनता हाणून पाडेल, असा विश्वास पोतनीस यांनी व्यक्त केला. सहा वेळा खासदार राहिलेल्या अनंत गीते यांनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. असा हा प्रामाणिक नेता पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा, असे आवाहनदेखील त्यांनी रायगडवासीयांना केले. भाजप मित्र पक्षांना नेहमीच दुय्यम वागणूक देत असतो. याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे. शिवसेनेला संपवण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. मात्र त्यांचा हा डाव उधळून लावण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे, असेही संजय पोतनीस यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, अॅड. गौतम पाटील, पिंटय़ा ठाकूर, कविता ठाकूर, समीर ठाकूर, कमलेश खरवले, संदीप पालकर, अजय झुंझारराव तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.