भाजपच्या गोदामात सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया; अखिलेश यादव यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव कनौज येथून मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली असून पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर आणि एनडीएवर घणाघाती टीकास्त्र सोडले. भाजपच्या गोदामात आता सगळे भ्रष्टाचारी आणि माफिया भरलेत असा हल्ला त्यांनी मोदी सरकारवर चढवला आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने सर्व भ्रष्टाचारी, गुंड आणि माफियांना आपल्या गोदामात ठेवले आहे. जितक्या लोकांनी देशाचा पैसा लुटला त्या सर्व लोकांना भाजपने आपल्याकडे घेतल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसेच भाजपने इतके मोठे गोदाम घेतले आहे की, प्रत्येक पक्षातील नेत्यांचा त्यात समावेश केलाय, असा टोलाही अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला लगावला.

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचाही यादव यांनी समाचार घेतला. सरकारने शेतकऱयांचा गहू खरेदी केला नाही. त्यांनी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी असे केले, ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकेल. भाजपचा हाच इरादा असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.