मुसलमान तरुणासोबत मुलगी पळून गेली, नातेवाईकांनी आई-वडिलांना ठार मारले

उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका जोडप्याला लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या जोडप्याचा मृत्यू झाला आहे. दाम्पत्याच्या शेजाऱ्यांनीच त्यांना ही मारहाण केल्याचं उघड झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तपासात सहाय्य व्हावे यासाठी फिंगर प्रिंट आणि गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. या दाम्पत्याच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली असून तिने आपल्या आईवडिलांची हत्या ही शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने केली असल्याचे म्हटले आहे. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील सीतापूरमधल्या हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेपूर गावात हा प्रकार घडला आहे. मृत जोडप्याच्या मुलाचे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबातीस मुलीचे प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादातून 50 वर्षांच्या अब्बास आणि त्यांची पत्नी कमरुन्निसा यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामपाल, शैलेंद्र, सुनील यांच्यासह 5 जणांनी मारहाण केली होती. या दाम्पत्यावर शुक्रवारी संध्याकाळी हल्ला करण्यात आला होता. मारहाण करणाऱ्यांनी आरोप केला होता की रामपाल याच्या मुलीसोबत अब्बास आणि कमरुन्निसा यांचा मुलगा शौकत याचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी रामपालच्या मुलीला घेऊन शौकत पळून गेला होता.

रामपालच्या कुटुंबीयांनी शौकतवर गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे शौकतला अटक करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, शौकतची दोन दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटका झाली होती. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमध्ये धुसफूस सुरू होती. वाद विकोपाला गेला असता रामपालने आपल्या साथीदारांसह अब्बास आणि त्याच्या पत्नीला जीव जाईपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली आहे असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.