सत्ता बदलाचे वारे विखेंना लवकर कळतात; आमदार बाळासाहेब थोरातांचा टोला

नगरसह राज्यामध्ये महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता कोणाची येणार, हे लवकर कळते, असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावून त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर, नुकत्याच झालेल्या विदर्भ-मराठवाडय़ातील निवडणुकीमध्ये क्वचितच एखादी जागा भाजपला मिळेल. मात्र, इतर जागा या महाविकास आघाडीला मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

नगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ येथील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाधक्ष जयंत वाघ व किरण काळे उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, नगरबरोबरच राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटले. यावर विचारले असता, थोरात म्हणाले, मलासुद्धा थोडी माहिती मिळालेली होती. मात्र, सगळ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. विखे यांना अगोदर कळतं की कुणाची सत्ता येणार आहे. पण, त्यांना प्रवेश देताना मला विचारल्याशिवाय होणार नाही, असेही ते म्हणाले. या अगोदरसुद्धा या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षांमध्ये अनेक वेळेला पक्ष बदललेले आहेत. जिथे सत्ता येते तिथे जातात. हा अनुभव असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

नीलेश लंके नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते सामान्य भागातून आलेले आहेत. त्यांची लढाई एका धनदांगडय़ासोबत आहे, की ज्यांच्या ताब्यामध्ये अनेक संस्था आहेत. आर्थिक ताकद मोठी असलेल्यांबरोबर त्यांचा सामना आहे. त्यांना पाडण्यासाठी भाजप आणि दिग्गजांच्या सभा येथे घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये नीलेश लंके यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे आता कोणाच्या तरी दबावाखाली असल्यासारखे वाटतात. तसेच मराठवाडा, विदर्भ येथेही महाविकास आघाडीला चांगले वातावरण होते. तर, विखे यांचीही घराणेशाही आहे, त्यामुळे भाजपला घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही आमदार थोरात म्हणाले.