गुंड आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवण्यात माजी पोलीस अधिकाऱ्याचा हात, संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा मुलगा पार्थ पवार यांचे गुंडांसोबतचे फोटो प्रसिद्ध झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपण गुंडांसोबतचे मिंध्यांचे रोज फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार असल्याचे म्हटले आहे. खून, दरोडे, बलात्कार यातील आरोपी असलेले आणि जामीनावर बाहेर काढलेले गुंड मुख्यमंत्र्यांशी बोलून नक्की काय चर्चा करत आहे? या गुंडाचा वापर राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार आहे का ? का उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत ? असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, अजित पवारांचे चिरंजीव गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागते. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतो. गेल्या महिनाभरात वर्षा बंगल्यात आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर राजकीय बैठकांच्या नावाखाली गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी हे घडवून आणत आहे. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे आणि त्याचे आम्ही रोज पुरावे देत आहे. हे पंतप्रधानांना दिसत आहे का ?

मोदींनी देशाला गुलाम बनविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करताना, नेहरूंनी देशाला आळशी बनविले असे विधान केले होते. यावरूनही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. मोदींनी देशाला गुलाम केलं आहे. 80 कोटी जनतेला 5 किलो फुकट धान्य देणे ही लाच आहे, लोकांना आणखी आळशी बनविण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही फुकट खात राहा, आयतोबा म्हणून जगत राहा आणि आम्हाला मत देत राहा, असा प्रकार असल्याचे राऊत यांनी म्हटले.