अलंकापुरीतील इंद्रायणी नदी घाट चकाचक

विश्वशांती दत्त पदयात्रा श्री संत बाळगिर महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता व विश्वशांतीसाठी शिवनेरी ते रायगड किल्ल्यापर्यंत दत्तनाम पदयात्रा स्वच्छता अभियान ही मोहिम राबवण्यात आली. या अंतर्गत वढू, श्रीक्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटासह आळंदी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 

या अभियानात 700 वारकरी भाविकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. अलंकापुरीतील इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा नदी घाट स्वच्छ करीत घाट चकाचक करण्यात आला. हा उपक्रम राबविण्यास द.भ.प. विश्ववंदनीय साईनाथ महाराज वसमतकर गावागावात जाऊन दत्त संप्रदायाच्या माध्यमातून नामसंकीर्तन, राष्ट्रजागृती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र कल्याण, यासाठी श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवित आहेत.

 

या अभियानातून शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, रुग्णसेवा, वृक्षारोपण, अन्नछत्र, सामाजिक, राष्टीय सांस्कृतिक एकात्मता आदींचे माध्यमातून पद यात्रा मार्गावर जनजागृती केली जात आहे. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणेतून स्वच्छता अभियान राबवित असल्याचे साईनाथ महाराज यांनी सांगितले. यावेळी गोविंद ठाकूर तौर, अर्जुन मेदनकर, विश्वेश्वर घनकोट आदी उपस्थित होते.

आळंदी येथील नदी घाटावर दुतर्फ़ा स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली. आळंदीत स्वच्छता दिंडीतून जनजागृती करण्यात आली. माऊली मंदिरात श्रींचे दर्शन, वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिर प्रदक्षिणा आणि आळंदी शहरातील रस्ते तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अभियानामुळे इंद्रायणी नदी घाटावर प्रभावी स्वच्छता झाली.