नांदेड – नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

सांगवी जवळील आसना नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुलं पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

बुधवारी दुपारी तीन वाजता सांगवी जवळील आसना पुलाच्या खाली दोघेजण पोहण्यासाठी आले होते. ते पाण्यात शिरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. आजूबाजूच्या मंडळींनी आरडाओरडा केल्यानंतर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे हे घटनास्थळी आले. त्यांनी लगेच पोलिसांना तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला. आपत्ती व्यवस्थापनाचे रईस पाशा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी आले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. तब्बल दोन तासानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे दोघेही कामठा खु. येथील आहेत. साईनाथ दशरथ चुनूरकर (16) व राहुल रमेश आठवले (17) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलाविण्यात आले.