सामना अग्रलेख – वाढते ‘रेल्वे बळी’!

रेल्वेची सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक करण्यात आली आहे, अशी आरती मोदी सरकार ओवाळून घेत आहे. यंत्रणा खरोखरच इतकी आधुनिक झाली असेल तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडत आहेत? आधी बालासोरमध्ये तीन रेल्वेगाडय़ा एकमेकांवर आदळून 295 प्रवासी मृत्युमुखी पडले. आता बिहारातही रेल्वेचे 21 डबे रुळावरून घसरल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांचा जीवनप्रवासच थांबवणारे हे वाढतेरेल्वे बळीसरकारच्या दुर्लक्षाचे आहेत की रेल्वे प्रशासनाच्या आधुनिकीकरणाचे, हे आता सरकारनेच सांगावे!

ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा अपघाताला चार महिनेही उलटत नाहीत तोच आता आणखी एका रेल्वे दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू व सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. ताजी रेल्वे दुर्घटना बिहारच्या बक्सर जिल्हय़ातील आहे. लागोपाठ घडणारे रेल्वे अपघात आणि त्यात जाणारे बळी यामुळे रेल्वे प्रशासनाच्या एकूणच कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र बक्सरमधील ताजी रेल्वे दुर्घटना हा अपघात आहे की कुणी या एक्प्रेसला घातपात घडवला हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. दिल्लीहून गुवाहाटीकडे जाणारी आनंद विहार कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्प्रेस ही रेल्वेगाडी बुधवारी मध्यरात्री अचानक रुळावरून घसरली. बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ आधी एसी 3 टियरचे दोन डबे उलटले. रात्री साडेनऊची वेळ असल्याने प्रवासी झोपण्याच्या तयारीत असतानाच मोठा आवाज होऊन डबे उलटल्याने एकच हलकल्लोळ उडाला. त्यापाठोपाठ आणखी चार डबे रुळावरून घसरले व पुढच्या काही क्षणांत आणखी 15 डब्यांनी रूळ सोडले. लागोपाठ 21 डबे रुळावरून घसरल्याने आनंद विहार कामाख्या एक्प्रेसमधील प्रवाशांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. सुदैवाने मध्यरात्रीपूर्वीची वेळ असल्याने

आसपासच्या भागांतील

लोकांनी तत्काळ रेल्वेमार्गाच्या दिशेने धाव घेत मदतकार्य सुरू केले. बक्सर जिल्हय़ातील डॉक्टरांची पथके आणि जिल्हा प्रशासनाची मदत व बचाव कार्याची पथके वेळेत पोहोचल्याने दुर्घटनेतील बळींचा आकडा मर्यादित राखता आला. आता दुर्घटनेनंतर हा घात की अपघात, अशी चर्चा होत असली तरी बिहारच्या नक्षलग्रस्त प्रभावित जिल्हय़ांच्या यादीत बक्सरचा समावेश नसल्यामुळे लगेचच या घटनेला घातपात मानायला पोलीस अधिकारी तयार दिसत नाहीत. तथापि, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथून पुढेही काही अंतरावर रेल्वेमार्गावरील रूळ तुटलेल्या अवस्थेत आढळले आहेत. एकाच ठिकाणी नव्हे, तर अनेक ठिकाणी रूळ तुटलेले दिसत असल्याने हा अपघात नसून घातपात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. अपघात असो वा घातपात, मात्र सर्वाधिक सुरक्षित प्रवास म्हणून जनतेचा ज्या रेल्वेवर विश्वास होता तो विश्वास गेल्या काही वर्षांत डळमळीत झाला आहे, हे तर मान्य करावेच लागेल. कुठल्याही रेल्वे दुर्घटनेनंतर तांत्रिक चूक, मानवी चूक किंवा घातपात या दुर्घटनांच्या संभाव्य कारणांभोवती काही दिवस चर्चा फिरत राहते,

चौकशी समिती

वा आयोग नेमले जातात, अहवाल सादर केले जातात. त्यात रेल्वेच्या त्रुटींवर जसे बोट ठेवले जाते तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांची जंत्रीही मांडली जाते. मात्र असे अहवाल सादर होईपर्यंतच वा त्याच्या मागेपुढे नवी दुर्घटना घडते व पुन्हा त्याच त्या चौकशा आणि त्यांच्या अहवालांच्या जाडजूड फायली हे दुष्टचक्र मागच्या अपघाताकडून पुढच्या अपघाताकडे सरकत जाते. रेल्वेची सुरक्षा यंत्रणा कशी अत्याधुनिक करण्यात आली आहे, अशी स्वतःचीच आरती मोदी सरकार गेली काही वर्षे ओवाळून घेत आहे. यंत्रणा खरोखरच इतकी आधुनिक झाली असेल तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडत आहेत? आधी बालासोरमध्ये तीन रेल्वेगाडय़ा एकमेकांवर आदळून 295 प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यातील 28 अनोळखी मृतदेहांवर तर आता बुधवारी, म्हणजे तब्बल चार महिन्यांनंतर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्दैवी रेल्वे प्रवाशांच्या चितेची आग शांत होण्यापूर्वीच आता बिहारातही रेल्वेचे 21 डबे रुळावरून घसरल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. शंभरहून अधिक प्रवासी जखमी झाले. प्रवाशांचा जीवनप्रवासच थांबवणारे हे वाढते ‘रेल्वे बळी’ सरकारच्या दुर्लक्षाचे आहेत की रेल्वे प्रशासनाच्या आधुनिकीकरणाचे, हे आता सरकारनेच सांगावे!