राम नवमीला पश्चिम बंगालमध्ये भाजपाने हिंसाचार घडवला; तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

मुर्शिदाबाद शक्तिपूर राम नवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत स्फोट झाला होता. तर मुर्शिदाबादमध्येच रेजीनगर येथे एका इमारतीच्या छतावरून तुफान दगडफेक झाली होती. तसेच मेदिनीपूर येथे दोन गटांत धुमश्चक्री उडाल्याचीही घटना घडली.  या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरिक जखमी झाले होते. राम नवमीच्या पवित्र दिवशी हा हिंसाचार भाजपानेच घडवून आणला, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

या घटनेत काही पोलीसही जखमी झाले. एका धर्माच्या लोकांनी दुसऱया धर्माच्या लोकांची डोकी फोडली. भाजपा आमदार सोबत मोठय़ा प्रमाणावर गँग घेऊन आला होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तर याप्रकरणी भाजपाच हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत असून हे प्रकरण एनआयएकडे सोपवून सखोल तपास करावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.