बंद पडलेले पथदिवे सुरू करा, नगरमध्ये शिवसेनेचा ‘कंदील मोर्चा’

सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तत्काळ सुरू करण्यात यावेत, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगर महापालिकेवर ‘कंदील मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आयुक्तांना कंदील भेट देण्यात आला.

याप्रसंगी युवासेना सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, अमोल येवले, परेश लोखंडे, अशोक दहीफळे, मुन्ना भिंगारदिवे, संतोष पाटील, अरुण झेंडे, महेश शेळके, उमेश भांबरकर, संतोष डमाळे, पप्पू ठुबे, गुडू भालेराव, विशाल गायकवाड, जेम्स आल्हाट, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, श्रीकांत कोडम, अमित लढ्ढा, सुरेश क्षीरसागर, दत्तात्रय हजारे, सुनील भोसले, अक्षय नागापुरे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकापासून पुढे हडकोकडे जाणारे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या रस्त्याचे आणि पथदिव्यांचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटून गेले आहेत; परंतु या ठिकाणी पथदिवे जाणूनबुजून बंद ठेवण्यात आले आहेत. सावेडी भागातील हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठी वर्दळ असलेला रस्ता आहे. नगर आकाशवाणी, तहसील कार्यालय, मनपा प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्र, तोफखाना पोलीस ठाणे या रस्त्यावर आहे.

प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीच्या वेळी चौपाटीसारखे वातावरण असते; पण येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच छोटे-मोठे वाहन अपघात घडतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावर सामसूम असताना अनेक वाहनचालक या पथदिव्यांना धडकतात. कोटय़वधी रुपये खर्च करून मनपाने संपूर्ण शहराचे पथदिवे बदलले. त्याची दुरुस्ती आणि देखभालीचे टेंडर एका खासगी कंपनीला दिले. मनपाचे वाढत चाललेले वीज बिल कमी करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. हे विजेचे बिल वाचविण्यासाठी ठेकेदारच आळीपाळीने पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद ठेवत असावा, अशी शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.