महाराष्ट्रात जे सुरुय तीच खरी ‘मोदींची गॅरंटी’, भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाच्या शहप्रमुखावर पोलीस स्थानकामध्ये गोळीबार केला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रात जे सुरुय तीच खरी ‘मोदींची गॅरंटी’ असल्याचा टोला लगावला.

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदेंनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही, असे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निवेदनात म्हटल्याचा उल्लेखही वडेट्टीवार यांनी केला.

ते पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज खालील गोष्टींची खात्री पटलेली आहे.
1. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार हे गद्दार आहेत हे भाजपला देखील मान्य आहे
2. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकमेकांसोबत पुढे सुद्धा गद्दारी करतील.
3. महाराष्ट्रात आज गुन्हेगार आणि गुंडांच राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाला घाबरून गप्प बसण्यापलीकडे पर्याय नाही.
4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांची जी दादागिरी महाराष्ट्रभर सुरू आहे याची त्याची पूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती असे खुद्द भाजप आमदार सांगत आहे तरी यावर कारवाई होत नाही.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे मुडदे पाडलेत; संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहे, सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहे, सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदला हे सगळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला.