सामना अग्रलेख – गंजलेले आणि गांजलेले

काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?

काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करीत आहेत. आपण देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान न ठेवता ते भाजपच्या मेळाव्यांतून भाषणे करीत आहेत. मोदींचे म्हणणे आहे की, ‘‘सर्वात आधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे.’’ मोदी यांचे हे विधान राजकीय संस्कृती व सभ्यतेस धरून नाही. काँग्रेस पक्ष संपला असे मोदी म्हणतात, पण गेल्या नऊ वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मोदींनी काँग्रेसचा जप केला नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही अलोकशाहीवादी गर्जना त्यांनी केली, पण त्यांना काँग्रेसला संपवता आले नाही. मोदी यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांना संपवायचे आहे, पण त्यांना लडाखमध्ये घुसलेल्या चीनला संपवायचे नाही. त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार संपवायचे नाहीत. त्यांना काँग्रेसला संपवायचे आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना काँग्रेस, शिवसेना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवता आले नाही. खरं म्हणजे मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीला

काहीच संपवता

आलेले नाही. ईडी, सीबीआय हाताशी नसेल तर या वेस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, असे देशाचे वातावरण आहे. ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती होताच वेस्ट इंडिया कंपनीने घाईघाईने ‘एनडीए’चा जीर्णोद्धार केला. त्या एनडीएतून आता तामीळनाडूतील प्रमुख पक्ष ‘अण्णा द्रमुक’ बाहेर पडला. अण्णा द्रमुक-भाजप चार वर्षे एकत्र होते. आता अण्णा द्रमुक एनडीएतून बाहेर पडला. 2024 पर्यंत मारून मुटकून बनवलेला ‘एनडीए’चा तंबू पूर्णपणे रिकामा पडलेला दिसेल. कारण मोदी-शहांच्या भाजपचे राजकारण हे द्वेष, सूड, बदला, फसवणूक या चतुःसूत्रीवर आधारित आहे व सनातन धर्मात या चारही गोष्टींना स्थान नाही. अचानक श्री. मोदी यांना सनातन धर्म वगैरे आठवू लागला आहे, पण त्यांना धर्म हवा आहे तो राजकारणासाठी, धर्माधर्मात भांडणे लावण्यासाठी. त्यामुळे देशातले नागरी जीवन संकटात आले आहे. काँग्रेसवर शहरी नक्षलवादाचा आरोप श्री. मोदी करतात, पण नव्या संसदेत त्यांच्या पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी सहकारी खासदाराविषयी ज्या भाषेचा वापर केला ती झुंडशाही लोकशाहीच्या कोणत्या नक्षलवादात बसते? काँग्रेसला गंज चढला असेल तर भाजपला सत्तेची भांग चढली आहे. भाजपचे अनेक पुढारी ज्या पद्धतीने वागतात व बोलतात ते पाहता त्यांना

जिभेचा डायरिया

झाला आहे व काँग्रेसचे गंजणे परवडले, पण यांचा डायरिया देशविघातक आहे. काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांची भाषणे ही त्यांच्या पदाला शोभेशी नाहीत. त्यात फक्त व्यक्तिगत द्वेषाचे फूत्कार आहेत. काँग्रेस हा त्यांच्या जीवनाचा भाग बनला आहे. उठता, बसता, झोपता त्यांना काँग्रेस दिसते. काँग्रेसने कर्नाटक जिंकले. काँग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा जिंकत आहे. काँग्रेस राजस्थानात जिंकण्याच्या रेषेवर आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?