सामना अग्रलेख – देशाचे बदलते वारे!

दिल्लीतजी-20’चा दरबार भरला आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढली वगैरे ठीक आहे, पण इकडे स्वदेशात त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यात भाजपचा गडइंडियागटाच्या काँग्रेसने जिंकला. महाराष्ट्रात पुणे, चंद्रपूर या दोन लोकसभा रिकाम्या आहेत. पण तेथे निवडणूक घेण्याची हिंमत भाजप प्रायोजित निवडणूक आयोगात नाही. कारण लोकांत पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारविरोधात संताप आहे. फसवणूक लुच्चेगिरीची नऊ वर्षे देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली. लोक आता फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत. सात पोटनिवडणुकांच्या निकालात देशाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते स्पष्ट झाले. आज वारे वाहत आहेत. येणाऱ्या तुफानाची ही सुरुवात आहे!

दिल्लीत ‘जी-20’चा मोदी उत्सव साजरा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनपासून दक्षिण आफ्रिकेच्या रामाफोसांपर्यंत वीसेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. जागतिक महाशक्ती आपण बनतोच आहोत अशी हवा मोदी व त्यांचे प्रचारक निर्माण करीत आहेत. पण सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने ही ‘हवा’ काढून घेतली. जगात महाशक्ती व स्वदेशात राजकीय शक्तिपात असे चित्र आता स्पष्ट झाले. सात विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ आघाडीस चार तर मोदीप्रणीत एनडीएला तीन जागा मिळाल्या. या तीनपैकी दोन जागा त्रिपुरा राज्यातल्या आहेत. 27 पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची ही पहिली चाचणी परीक्षा होती व त्या परीक्षेत ती पास झाली आहे. उत्तर प्रदेशातील (घोसी), उत्तराखंड (बागेश्वर), झारखंड (डुमरी), प. बंगाल (धुपगुडी), धनपूर, बॉक्सानगर (त्रिपुरा), केरळ (पुथुपल्ली) अशा या निवडणुका झाल्या. त्रिपुरा, उत्तराखंडात भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे तीन जागा त्याने जिंकल्या. उत्तर प्रदेशातील घोसीच्या जागेवर सपातून भाजपात गेलेले आमदार दारासिंह चौहान यांनी राजीनामा दिला व तेथे निवडणूक झाली. घोसी जिंकण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री, डझनभर मंत्री, शंभरावर आमदार मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. सत्ता व पैशांचा वापर झाला. तरीही घोसीच्या मतदारांनी भाजपवासी झालेल्या दारासिंह चौहान यांचा दारुण पराभव केला. तेथे ‘सपा’चे सुधाकर सिंह यांनी मोठा विजय संपादन केला. घोसीत धार्मिक तणाव निर्माण केला. अप्रत्यक्षपणे

धार्मिक मुद्दा आणून

लोकांना भडकवले, पण मतदारांनी काही ऐकले नाही व सपा उमेदवाराचा विजय केला. फोडाफोडीचे राजकारण घोसीत नष्ट केले. उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यातील हे ‘क्लायमेट चेंज’ म्हणजे हवामान बदलाचे उदाहरण आहे. 80 जागा या एका राज्यात आहेत. अयोध्येत राममंदिर, लव्ह जिहाद असे धार्मिक मुद्दे भाजपच्या प्रचारात आणले जातात. मुसलमान-दलितांविरुद्ध द्वेष पसरवून निवडणुकांत मते मागितली जातात. पण घोसीच्या मतदारांनी हे सर्व फंडे ठोकरून लावले. सत्ता पक्षाने पोटनिवडणुकांच्या आधी ‘इंडिया’वर फुली मारून ‘भारत’चा नारा दिला. तरीही घोसीत ‘इंडिया’चा विजय झाला. एकीत बळ आहे व ते घोसीतल्या विजयाने सिद्ध केले. उत्तर प्रदेशात या वेळी मोठा चमत्कार घडेल असे वातावरण आहे. सपा, काँग्रेस एकत्र आहे. मायावतींचे शेवटपर्यंत तळ्यात-मळ्यात आहे. ईडी, सीबीआय चालवणारे कोणते सरकार येत आहे हा अंदाज घेऊन त्या निर्णय घेतील. पण कोणी कितीही आडमुठे धोरण स्वीकारले तरी उत्तर प्रदेशात या वेळी भाजपास मोठा फटका बसेल. प. बंगालातील धुपगुडी जागा तृणमूल काँग्रेसने जिंकली, पण भाजपास मिळालेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. झारखंडच्या डुमरी मतदारसंघावर झारखंड मुक्ती मोर्चाने विजय मिळवला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्र सरकार कमालीचा त्रास देत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून श्री सोरेन यांचा

छळ सुरू असला तरी

झारखंडचे मुख्यमंत्री झुकले नाहीत हे महत्त्वाचे. आता झारखंडची विधानसभा पोटनिवडणूक हेमंत सोरेन यांनी जिंकली आहे. केरळात काँगेसचे ज्येष्ठ नेते ओमान चांडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुथुपल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र चांडी ओमान यांनी विजय मिळविला. केरळात काँग्रेसचा बोलबाला आहेच हे चांडी ओमान यांच्या विजयाने दिसून आले. भाजपने ज्या तीन जागा जिंकल्या, त्यातील दोन जागा एकटय़ा त्रिपुरातील आहेत आणि एक उत्तराखंडातील. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ही लहान राज्ये आहेत, पण उत्तर प्रदेश, झारखंड, केरळ, प. बंगालचा कौल हा देशाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते दर्शविणारे आहे. दिल्लीत ‘जी-20’चा दरबार भरला आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढली वगैरे ठीक आहे, पण इकडे स्वदेशात त्यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसब्यात भाजपचा गड ‘इंडिया’ गटाच्या काँग्रेसने जिंकला. महाराष्ट्रात पुणे, चंद्रपूर या दोन लोकसभा रिकाम्या आहेत. पण तेथे निवडणूक घेण्याची हिंमत भाजप प्रायोजित निवडणूक आयोगात नाही. कारण लोकांत पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारविरोधात संताप आहे. फसवणूक व लुच्चेगिरीची नऊ वर्षे देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली. लोक आता फसवणूक करून घ्यायला तयार नाहीत. सात पोटनिवडणुकांच्या निकालात देशाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते स्पष्ट झाले. आज वारे वाहत आहेत. येणाऱ्या तुफानाची ही सुरुवात आहे!