भ्रष्टाचाऱ्यांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री करू, ही आहे मोदी गॅरंटी! उद्धव ठाकरेंचा घणाघात

यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी सरकारकडून मोदी गॅरंटी ही टॅग लाईन प्रचारासाठी वापरली जात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही, रोजी रोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचाऱ्यांनो भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मुख्यमंत्री करू ही मोदी गॅरंटी आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अशी गॅरंटी तुम्हाला परवडेल का? असा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला केला.

नांदेडचे आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज प्रत्येक जण आपापलं बघतो आहे मग माझ्या शेतकऱ्याचं जे काही दु:ख आहे, त्याच्याकडे कोण बघतं आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक नेता स्वत:चं घर, करिअर, मला सहा वर्ष राज्यसभा मिळाली मस्तपैकी राहीन. पण शेतकरी आत्महत्या करतो आहे त्याच्या घरात जाऊन बघ तो तुला किती शिव्या देतो आहे ते बघ, असं उद्धव ठाकरेंनी सुनावलं.

अब की बार 400 पार म्हणणाऱ्यांना शेतकरी विचारतील की माझ्या घरातला कर्ताकरविता गेला काय म्हणून मी मत देऊ? असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकारच्या रथावरून, त्यांच्या योजनांवरून देखील त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांना त्यांचं शेत, किती खर्च झाला आणि मग त्याच्या 50 टक्के जादा हमी भाव देऊ असं आश्वासन किंवा थाप मोदी सरकारनं मारली होती. त्याचं आता काय झालं? कुणाला त्याप्रमाणे हमी भाव मिळाला? मग शेतकऱ्यांसाठी कोण लढणार. शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही, रोजी रोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचाऱ्यांनो भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मुख्यमंत्री करू ही मोदी गॅरंटी आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं. कालपरवापर्यंत जागावाटपामध्ये हिरीरीने सहभाग घेत होते. मग आज असं अचानक काय घडलं की, अशोक चव्हाण तिकडे जात आहेत, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. ‘निवडणूक आयोगाने शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी काँग्रेसही चोराच्या हातात दिली. आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात की काय हे पाहावे लागेल. कारण हे काहीही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटताहेत. बेटकुळ्या तर काय येतच नाहीयेत, बेटकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागत आहेत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संसदेमध्ये सुद्धा पंतप्रधानांनी भाषण केलं. अबकी बार एवढे पार, अबकी पार तेवढे पार, मग जर एवढे पार असतील तर मग ही फोडाफोडी का करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे. तुम्ही 400 पार काय, 40 पार पण होणार नाही आहात. म्हणून मग तिकडे नितीश कुमारांना घेतलं जातंय, इकडे अशोक चव्हाणांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. मिंधेंना घेतलं. भाजपने दहा वर्षे जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जात आहेत आणि ते भाजपमधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत त्यांच्या बोडक्यावर बसवले जात आहे’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसव्याप्त भाजप…

‘काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत असा भाजपचा नारा होता. मात्र आता आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेताहेत की, आता काँग्रेसव्याप्त भाजप अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणखी काही वर्षांनी असंही होईल की, भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल’, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष तुम्ही ज्या पद्धतीने नष्ट करायला निघाला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातील जनता बघते आहे, असा इशाराही देखील त्यांनी यावेळी दिला.