पेपरफुटीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, नीट प्रकरणी राहुल गांधी यांची सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल ‘एक्स’वर पेपरफुटीच्या घटनांवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी रिया या विद्यार्थिनीच्या वडिलांचा उल्लेख करत पेपरफुटीमुळे अनेक कुटुंबांवर ओढवलेल्या दुःखाकडे लक्ष वेधले.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “रियाचे वडील राजेशजी मुलीला गमावल्यानंतर इतके खचले आहेत की त्यांची अवस्था पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही. पेपरफुटीने अशा अनेक कुटुंबांकडून त्यांची मुले हिरावून घेतली आहेत.”

प्रत्येक मुलासाठी आई-वडिलांचे स्वप्न आणि त्याग असतो. मात्र, अशा घटनांमुळे अनेक पालकांच्या आयुष्यातील उद्याची आशाच संपल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विद्यमान व्यवस्थेवरही टीका करत “ही संपूर्ण व्यवस्था नव्याने उभी करावी लागेल. अशी व्यवस्था हवी जिथे मुलांना तणाव नव्हे तर सुरक्षितता मिळेल आणि पालकांना त्यांच्या त्यागाचे फळ अश्रू नव्हे तर यशाच्या रूपाने मिळेल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.