खवा, मावा तपासायचा की चिकनमधला ‘उंदीर’ शोधायचा; सणांच्या महिन्यात अधिकाऱ्यांपुढे पेच

>> आशीष बनसोडे

वांद्रय़ाच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चिकन थाळीत उंदीर सापडल्याने शहरातील हॉटेल्स आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या रडारवर आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी करण्यासाठी एफडीएने विशेष मोहीमच हाती घेतली आहे. पण या विशेष मोहिमेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण शहरातील 18 हजार 481 हॉटेलच्या तपासणीसाठी एफडीएकडे फक्त 13 अन्न सुरक्षा अधिकाऱयांची फौज आहे. तेव्हा सणांच्या महिन्यात खवा, मावा तपासायचा की चिकनमधला ‘उंदीर’ शोधायचा, असा पेच अधिकाऱयांपुढे पडला आहे.

एखादी घटना घडली की शासकीय यंत्रणा खडबडून जागी होते. मग त्या घटनेच्या अनुषंगाने धडक कारवाया सुरू केल्या जातात. आता वांद्रय़ातल्या हॉटेलात चिकन थाळीत उंदराचे मांस मिळाल्याने हॉटेलात दिले जाणारे खाद्यपदार्थ, अन्न व पेय कळीचा मुद्दा बनले आहेत. चिकन थाळीत उंदीर मिळाल्याचे कळताच एफडीएने याची लगेच गंभीर दखल घेत संबंधित हॉटेलला नोटीस बजावली आणि त्याचबरोबर शहरातील 18 हजार 481 हॉटेलांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीमदेखील हाती घेतली. परंतु इतक्या हॉटेलांची तपासणी एफडीएचे केवळ 13 अन्न सुरक्षा अधिकारी करणार असल्याने ही मोहीम केवळ फार्स ठरणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे. काम डोंगराऐवढे आणि अधिकारी बोटावर मोजण्याइतके अशी बिकट परिस्थिती एफडीएची झाली आहे.

आले सणसोहळे मग करायचे काय काय?
एफडीएच्या मुंबई विभागाकडे केवळ 13 अन्न सुरक्षा अधिकाऱयांची फौज आहे. चिकन थाळीतला उंदीर उजेडात आल्यानंतर या 13 अधिकाऱयांना शहरातील हॉटेलांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिमेच्या नावाखाली जुंपले आहे. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक हे चारही महिने सणांचे आलेत. या सणांमध्ये खवा, मावा, मिठाईची रेलचेल असते. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार सर्रास केले जातात. तेव्हा खवा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्याबरोबर चिकन, मटण थाळीतला ‘उंदीर’ शोधायची तारेवरची कसरत या अधिकाऱयांना करावी लागणार आहे.

एफडीएच्या मुंबई विभागाकरिता 49 अन्न सुरक्षा अधिकाऱयांची मंजुरी आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ 13 अधिकारीच कार्यरत आहेत. याचबरोबर अन्न विभागासाठी सहाय्यक आयुक्तांची (एओ) 13 पदे मंजूर असून 8 एओच कामाचा गाढा हाकत आहेत.

शिपायांचा चार्जपण सहाय्यक आयुक्तांकडेच
एफडीएमध्ये मनुष्यबळाची बोंब आहे. आवश्यक मनुष्यबळच नसल्याने अधिकाऱयांना सगळी कामे करावी लागत आहेत. चतुर्थ व तृतीय श्रेणीतला कर्मचारीवर्गच नसल्याने सहाय्यक आयुक्तांनाच आपल्याबरोबर शिपायाचे कामदेखील करावे लागत असल्याचे चित्र आहे.

संपूर्ण हॉटेलांची तपासणी एफडीएकडून केली जाते. वेळोवेळी विशेष मोहीम राबवून हॉटेलांबरोबरच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱया अन्य आस्थापनांचीदेखील तपासणी केली जाते. नागरिकांनीदेखील हॉटेलात जेवण करण्यासाठी गेल्यावर खाद्यपदार्थ घेताना काळजी घ्यावी. काही चुकीचे आढळल्यास एफडीएकडे तत्काळ तक्रार करावी.
– शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), एफडीए