आता उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी मुंबई उतरणार

आयपीएलचे 54 सामने झाले, पण अद्याप एकही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र आठ पराभवांमुळे आयपीएलमधून बाद होण्याचे दुर्दैव मुंबई इंडियन्सच्या पदरी पडले आहे. त्यामुळे उर्वरित तिन्ही सामन्यात आपली उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्स वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भिडणार आहे. दुसरीकडे हैदराबाद आपला सातवा विजय नोंदवून प्ले ऑफ प्रवेशासाठी आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करील. गुजरात सोडून मुंबईचे नेतृत्व स्वीकारणाऱया हार्दिक पंडय़ाचा पायगुण संघाला फारच घातक ठरला आहे. वानखेडेवर झालेल्या पाचपैकी दोन सामन्यांतच मुंबई विजयी ठरली. गेल्या सामन्यात मुंबईला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईच्या फलंदाजीसह गोलंदाजांची कामगिरीही फार उत्साहवर्धक राहिलेली नाही. रोहित शर्मा, इशान किशन यांच्या अपयशामुळे मुंबईने गुणतालिकेत तळ गाठले आहे. आता मुंबई फार वर जाण्याची शक्यता कमीच आहे, पण उरलेल्या तिन्ही सामन्यांत जोरदार कामगिरी करत मुंबईला आपला शेवट सुखद करण्याची संधी आहे.