परतीच्या पावसाच्या हलक्या सरी कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

देशाच्या अनेक भागातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तरीही काही भागातून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला आहे. तर येत्या दोन दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रात मॉन्सून कोकण किनारपट्टीवर रेंगाळला असून पूर्णपणे माघारी गेलेला नाही. त्यामुळे आगामी दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाच्या काही सरी बसरतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पूर्व आणि ईशान्य हिंदुस्थानातून मान्सून माघारी परतला आहे. आंध्र प्रदेशचा बराचसा भाग आणि तेलंगणाचे उर्वरित भागातूनही मान्सून माघारी परतला आहे. मंगळवारी नैऋत्य मान्सूनने बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित भागांतून माघार घेतली आहे. सिक्कीम, संपूर्ण ईशान्य हिंदुस्थान, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग, बंगाल आणि आंध्र प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण दिसून येईल. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र, ठाणे आणि मुंबईसह उपनगरात ऑक्टोबर हिटचा उकाडा असह्य होणार आहे. या आठवड्यात मॉन्सून महाराष्ट्रातूनही माघारी परतण्याची शक्यता आहे.