सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकजुटीने पुढे जात आहे. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीचाच 100 टक्के विजय होणार, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी खासदार संजय राऊत सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आणि आमदार विक्रम सावंत, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभूते हे उपस्थित होते.
आम्ही एकत्र असून महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 48 जागांची तयारी केली होती. महाविकास आघाडीनुसार जागावाटप झाले आणि तिन्ही पक्ष काम करत आहेत. यात सांगली आणि उतरलेल्या 47 जागांचाही समावेश आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील असून अर्ज भरला म्हणजे बंडखोरी होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 जागांवर मतदान होत आहे. यावरही खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. मी काल विदर्भात होते आणि यावेळी विदर्भ चमत्कार करेल. नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोही या जागांवर महाविकास आघाडी पुढे असून विजयी होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तिकीट दिले आहे. शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यापुढे नारायण राणे यांचे आव्हान आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, हा सामना एकतर्फी असून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान होते. राणे केंद्रीय मंत्री असून आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि यासाठी भाजपचे आभारी आहोत.
View this post on Instagram