छत्रपती शाहु महाराजांच्या विजयासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने लढतील, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरात छत्रपती शाहु महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. महाविकास आघाडीतर्फे शाहु महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विजयासाठी शिवसैनिकी पूर्ण ताकदीने लढतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शाहु महाराजांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज कोल्हापुरात शाहु महाराजांची भेट घेतली आहे. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहु महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील. आज महाविकास आघाडीतर्फे शाहु महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आणि मी महाराजांना तसं वचन दिलं आहे. प्रचाराला तर येईनच पण विजयाच्या सभेला येणारच, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

निवडणुकीसाठी छत्रपती शाहु महाराजांचे आशीर्वाद घेतल्याचं सांगताना त्यांना ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती यांचा ऋणानुबंध असल्याचंही म्हटलं. ते म्हणाले की, मी एवढं बोलून नाही थांबलो तर माझा स्वार्थही साधला आहे. आपण जो संघर्ष करतोय त्यात विजय मिळावा यासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघतोय. यात लपवून ठेवण्यासारखं काहीही नाही. आमचं जे काही आहे ते जगजाहीर आहे. आज मला आनंद वाटतोय की शिवसेनाप्रमुख असताना 97-98 साली मी इथे आलो होतो, त्यानंतर आता मी इथे आलो आहे. यापुढेही येत राहीन, असं ते म्हणाले.