कडक तरतुदी कशासाठी?

योगेश मिश्रा

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) मते, 2022 मध्ये हिंदुस्थानात ‘हिट अँड रन’ची एकूण 47,806 प्रकरणे घडली असून त्यात 50,615 जणांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ दर तासाला ‘हिट अँड रन’  प्रकरणात सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आणि दर दिवशी 140 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 47,530 घटना घडल्या आणि त्यात 43,499 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा देण्याची तरतूद केली आहे. नव्या कायद्यानुसार रस्ते अपघात प्रकरणातील दंडात वाढ केली असून शिक्षादेखील दहा वर्षांची करण्यात आली आहे. याला वाहतूकदारांकडून जोरदार विरोध झाला असला तरी त्यामुळे या तरतुदींची गरज दुर्लक्षिता येणार नाही.

रस्ते अपघातात आणि अन्य दुर्घटनेत मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण हिंदुस्थानात गंभीर आहे. 2022 मध्ये हिंदुस्थानात दर तासाला ‘हिट अँड रन’ प्रकरणात सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आणि दररोज 140 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. बहुतांश प्रकरणात मारेकरी, चालक हे पीडित व्यक्तीला रस्त्यात सोडून पळून जातात. अशा प्रकरणात दोषीला कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र देशभरात या तरतुदीवरून गदारोळ माजला आहे. वाहतूकदार, बस, ट्रक चालक,
टॅक्सी चालकांनी नव्या कायद्याला ‘काळा कायदा’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या कायद्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

देशातील अनेक भागांत बस आणि ट्रक चालक हे नव्या भारतीय न्याय संहितेला विरोध करत आहेत. त्यात ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा देण्याची तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार रस्ते अपघात प्रकरणातील दंडात वाढ केली असून शिक्षादेखील दहा वर्षांची करण्यात आली आहे. जुन्या कायद्यानुसार वाहन अपघाताच्या गुह्यात कमाल दोन वर्षांची शिक्षेची तरतूद होती.

नवा कायदा

भारतीय न्याय संहितेनुसार एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल आणि त्याचा उद्देश हत्येच्या श्रेणीत मोडत नसेल तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडदेखील भरावा लागेल.

गुन्हेगार पळून जात असेल आणि तत्काळ माहिती देण्यास हलगर्जीपणा करत असेल तर सात लाख रुपये दंड आणि कमाल दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

नव्या कायद्यानुसार ‘हिट अँड रन’ हा अजामीनपात्र गुन्हा आहे. नवा कायदा एप्रिल 2024 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

चालकांचा विरोध

नव्या नियमांवर वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी टीका केली आहे. अवजड वाहनांच्या चालकांविषयी भेदभावाची वागणूक असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. संपात भाग घेणाऱया चालकांत ट्रक चालक, खासगी बस चालक आणि काही ठिकाणी सरकारी बस चालकदेखील सामील आहेत. काही जणांनी सोशल मीडियावर म्हटले की, काही राज्यांतील टॅसी चालकदेखील या तरतुदींचा विरोध करत आहेत.

हा कायदा कशासाठी आवश्यक?

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) मते, 2022 मध्ये हिंदुस्थानात ‘हिट अँड रन’ची एकूण 47,806 प्रकरणे घडली असून त्यात 50,615 जणांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ दर तासाला ‘हिट अँड रन’ प्रकरणात सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला आणि दर दिवशी 140 जणांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये 47,530 घटना घडल्या आणि त्यात 43,499 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या देशात कसा कायदा?

बांगलादेश ः बांगलादेशमध्ये ‘हिट अँड रन’ किंवा कोणत्याही वाहन अपघातप्रकरणी एखादी व्यक्ती गंभीर जखमी होत असेल किंवा मृत्युमुखी पडत असेल तर संबंधित कलमान्वये गंभीर गुन्हा मानला जाईल. यात कमाल शिक्षा मृत्युदंडाची आहे. अधिनियम 105 नुसार होणारे गुन्हे अजामीनपात्र आहेत.

कॅनडा ः कॅनडात ‘हिट अँड रन’ला गंभीर गुन्हा मानले गेले आहे. त्यासाठी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. अपघातात गंभीर जखमी झाला किंवा मृत्यू झाला तर दोषीला दहा वर्षांचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

चीन ः चीनमध्ये रस्ते वाहतूक सुरक्षा कायद्याच्या कलम 101 नुसार एखाद्या मोठय़ा अपघातात किंवा ‘हिट अँड रन’मध्ये दोषी आढळलेल्या गुन्हेगाराचा परवाना रद्द केला जातो. तसेच त्याला आजन्म गाडी चालविण्याची परवानगी दिली जात नाही. कोणत्याही घटनेत किंवा ‘हिट अँड रन’मध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, गंभीर जखमी झाला किंवा मोठय़ा मालमत्तेची हानी झाली तर गुन्हेगाराला तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. अपघात स्थळावरून पळून गेल्याने जखमीचा मृत्यू झाला तर त्याला किमान सात वर्षांची शिक्षा होते.

दक्षिण कोरिया ः दक्षिण कोरियात ‘हिट अँड रन’ची दोन कलमे आहेत. चालकाने पीडिताची हत्या केल्यास किंवा तो मृत्यूला कारणीभूत ठरला आणि तो पळून जात असेल तर कलम 1 मध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची आणि कमाल शिक्षा जन्मठेपेची आहे. चालकाने घटनास्थळावरून पीडिताला हटविल्यास किंवा त्याला सोडून पळून गेल्यास आणि पीडिताचा मृत्यू झाल्यास जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय 50 लाखांपासून तीन कोटींच्या दंडाचीदेखील तरतूद आहे.

हिंदुस्थानात दरवर्षी दीड लाख जण मृत्युमुखी

हिंदुस्थानात दरवर्षी किमान 1 लाख 68 हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. देशातील रस्ते सुरक्षित नसल्याचा हा पुरावा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने रस्ते अपघातासंदर्भात चिंता व्यक्त करणारी आकडेवारी जारी केली. त्यानुसार हिंदुस्थानात 2022 मध्ये 4 लाख 61 हजार अपघात झाले. त्यात 1.68 लाख जणांचा मृत्यू झाला, तर 4.43 लाख जखमी झाले. मृत्युमुखी पडणाऱया 66.5 टक्के लोकांचा वयोगट 18 ते 45 दरम्यानचा होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी)  आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 1 लाख 52 हजार जणांचा मृत्यू झाला, तर 2017 मध्ये हा आकडा दीड लाख होता.

मृत्यूकडे नेणारा वेग

अति वेगाने वाहन चालविल्याने रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱया लोकांचे प्रमाण 71.2 टक्के आहे. सर्वाधिक अपघात दुचाकी वाहनांचे झाले आहेत. याशिवाय 47.7 टक्के अपघात आणि 55.1 टक्के मृत्यू हे मोकळ्या ठिकाणी झाले. म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी झालेले नाहीत. अहवालानुसार 67 टक्के अपघात हे सरळ रस्त्यावर झाले, तर केवळ 13.8 टक्के अपघात अवघड वळण, खड्डे, घाटरस्त्यावर झाले आहेत. अपघातांची राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक अपघात तामीळनाडूत झाले. मात्र मृत्यूची संख्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, 68 टक्के अपघात ग्रामीण भागात, तर 32 टक्के अपघात शहरी भागात झाले आहेत.

सहज मिळणारा परवाना

देशात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. चालक परवानादेखील सहजपणे मिळत आहे. रस्त्यांची स्थितीदेखील कमीअधिक प्रमाणात चांगली आहे. वाहतूक कायदेदेखील कडक आहेत, परंतु नियमांची आणि कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. गाडी चालवताना मोबाइल वापरणे चुकीचे आहे, बेकायदा आहे. मात्र या नियमांकडे कोणीही लक्ष देत नाही. चारचाकी आणि दुचाकीस्वार बिनदिक्कतपणे मोबाइलवर बोलत गाडी नेत असतात. गाडीचा वेग तर नियंत्रित नसतो. लेन मोडून ओव्हरटेक करण्यात येते. वाहतूक नियमांना हरताळ फासला जातो. सर्वात म्हणजे काही जण वाहतूक नियमांना महत्त्वच देत नाहीत. यामागचे कारण म्हणजे नेते, पोलीस, मोठे अधिकारी यांच्याकडूनच नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. त्यामुळे बडय़ा लोकांना, मोठय़ा गाडय़ांना नियम नसतो असा समज निर्माण झाला आहे. हेच समस्येचे मूळ कारण आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आहेत.)