आज लोकसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांसह देशातील जनताही मतदानाच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहे. बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. त्याचवेळी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

देशभरातील लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नावीन्यपूर्ण घोषणा होणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. ही प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या होणार आहे. आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या राज्यांत विधानसभा निवडणूक

लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

– केंद्रातील सत्ताधारी भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱयांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर देशभरातील सर्व विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत मोदी सरकारची हुकूमशाही राजवट उलथवून लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर खऱया अर्थाने देशात लोकशाहीचा महासंग्राम सुरू होणार आहे.