इथे लोकं मरतायत आणि हे दिल्लीत मुजरा मारायला जातायत, अंबादास दानवे यांची टीका

नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयात लोकं मरात आहेत. आणि आपले मुख्यमंत्री व सुपर मुख्यमंत्री दिल्लीत मुजरा मारायला जातायत. हे वाईट आहे, असा सणसणीत टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. नांदेड व छत्रपती संभाजीनगर प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी ट्विट करत राज्य सरकारला फटकारले आहे.

”नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाचा कळस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आयषधांची कमतरता, निष्काळजीपणा, वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून राहिलेल्या फाईली हेच या घटनेच्या मागचे कारण आहे. कोणत्या डॉक्टरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती लांबवण्यात आली, ज्याची किंमत तिला आणि तिच्या बाळाला जीव देऊन चुकवावी लागली? सरकार सांगेल का?”, असा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

चौकशी वगैरे हे सगळे फार्स आहे. मनुष्यबळ अपुरे असेल तर ते का दिले गेले नाहीत? इथे लोक मारतात आणि सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला मुजरा मारायला जातात, हे वाईट आहे, अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे.

हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?

”तातडीने आनंदाचा शिधा मंजूर होतो (वाटला जातो की नाही, देव जाणे) पण औषधी आणि रुग्णालयात सुविधा देण्यासंबंधीच्या फाईली लाल फितीत अडकतात, हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? पालकमंत्री नियमितपणे रुग्णालयात येऊन बसले, आढावा घेतला तर डॉक्टरांची निष्काळजीपणा करण्याची हिंमतच होणार नाही” अशी टीका दानवे यांनी केली आहे.

अधिष्ठातांना संडास स्वच्छ करायला लावणे निंदनीय

नांदेडच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना संडास स्वच्छ करायला लावणे निंदनीय आहे. घाण असेल तर ती स्वच्छ करायला नेमून दिलेली माणसे बोलावता आली असती, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.