पिओ बियर….करो सरकार को चिअर; अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा

राज्यातील बियर विक्रीत घट झाल्याने राज्य सरकारने बियरचा खप वाढावा एक अजब निर्णय घेतला आहे. बियरचा खप वाढावा यासाठी सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. त्यांच्या या निर्णयावरून विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.

”महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधीचाही समावेश केला आहे. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे…! रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतणार वाटतं सरकार… जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. पिओ बियर….करो सरकार को चिअर”, असे ट्विट करत दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.