अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱयादरम्यान शनिवार, 23 सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाला येणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुंबई विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या गणेशोत्सव काळातील सुट्टय़ा रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात आले आहे. त्यामुळे युवासेना आक्रमक झाली आहे. गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी पूर्वसूचना देऊन सुट्टी घेतलेल्या कर्मचाऱयांची सुट्टी मंजूर करावी, अशी मागणी युवासेनेतर्फे कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 23 सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर कावासजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अमित शहा ‘सहकार’ या विषयावर बोलणार आहेत. शहा हे विद्यापीठात येणार असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कोणाही पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहू नये, असे परिपत्रकच मुंबई विद्यापीठाने काढले आहे.

विद्यापीठातील बहुतेक कर्मचारी कोकणात राहणारे असून गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या मूळगावी जात असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामवंत मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामध्येच हा कार्यक्रम घेऊन फक्त विद्यापीठाचे कर्मचारीच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱयांनी मूळगावी जाण्याकरिता पूर्वसूचना देऊन सुट्टी घेतली आहे त्यांची सुट्टी मंजूर करावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ यांनी कुलगरूंकडे केली आहे.