तलाठी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर कारवाई करा नाहीतर सरकारविरोधात उभा राहीन, असा संतप्त इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार बच्चू कडू यांनी आज दिला. बच्चू कडू यांनी तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाबद्दल लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले. सहा महिन्यांनंतरच्या सर्व परीक्षा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्या, अशी मागणीही कडू यांनी केली आहे. कोणत्याही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी फक्त एक हजार रुपये फी घ्यावी, असे ते म्हणाले. अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी परीक्षेचा दुपारचा पेपरही दीड तास उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला.