परीक्षण – नव्या अनुभूतीची संवेदनक्षम कविता

>>प्रसाद सावंत

आधुनिक विज्ञानवादी तंत्रज्ञानाची आजची आवश्यकता जशी कवीची प्रेरणा ठरू शकते, तशीच ती त्याच्या संवेदनेलाही आतून अस्वस्थ करून त्यायोगे आपल्या विचारधारेलाही विज्ञानाच्या कसोटीवर घासून परखड आणि समृद्धतेकडे आपसूक घेऊन जात असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आजचा सुशिक्षित कवी अन् त्याची संवेदनासुद्धा वास्तव भूमिकेला जागून त्यायोगे आपली वेदनेची तीव्रता डोळसपणे आपल्यात साठवून तिचा हुंकार प्रकट करीत असतो. त्यामुळेच कालची आणि आजची कविता ही एका पिढीच्या अंतरातील अनुभूतीचे निर्णायक पाऊल ठरू शकते. ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या संग्रहात याच नव्या बदलांचे पडसाद उमटताना दिसतात. जुन्या काळातील संघर्ष, त्याच्या अनुभूतीचे, वैचारिक बदलांचे कालानुरूप होत असलेले सकारात्मक वैज्ञानिक तसेच तांत्रिक बदल ही कविता सोबत घेऊन येताना दिसते. यादृष्टीने याच स-ंग्रहातील ‘परीक्षण’ ही कविता फार बोलकी आहे.

केलंच जर कवीचं नार्को परीक्षण  

सीटी स्कॅन, 

लाय डिटेक्टर चाचणी  

तर समजतील सारी उगमस्थानं कवितेतली? 

तर त्यांच्या ‘पतंग’ या कवितेत पतंग हा त्या मुलाच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनतो.

पतंगाची फिरकी द्रौपदीसारखी अंगावरचे वस्त्र फेडताना, आपसूकपणे केवळ ढील देणाऱया ‘त्याच्या’ उंच भरारी घेऊ पाहणाऱया महत्त्वाकांक्षेपोटी स्वत:च्या आयुष्यालाच गरगर फिरवून घेते. कारण ढील देणाऱया हातात महत्त्वाकांक्षेचं वारं संचारलेलं असतं.

माझ्या हातातली फिरकी  

गरगरतेय द्रौपदीसारखी 

नि सुटत चाललेला त्यातील दोर  

जणू दु:शासनाने ओढलेली साडी  

इथे कवी स्त्राrचे एखाद्याच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी होणारे वस्त्रहरण आणि नात्यामधल्या बंधनाचंही बेपर्वाईचे तेगारलेपण दाखवण्याचा प्रयत्न करीत असावा व तरीही येथे महत्त्वाकांक्षा हा भाग महत्त्वाचा. कारण कवी हा केवळ पतंगाच्या रूपकाद्वारे अनुभूतीला व्यक्त करतो. ‘बासऱयांचे झाड’ या कवितेत कवी वाऱयाला सारथ्य करणाऱया कृष्णाच्या आविर्भावात पाहतो, तर बासरीवाल्याच्या प्रतीकातून कवी आयुष्यातील संगीत आपणाकडेच असूनही त्याचा थांगपत्ता माहीत नसल्याकडे लक्ष वेधताना दिसतो ते पुढील ओळींतून,

प्रत्येकाच्याच खांद्यावर असतं  

एक अदृश्य बासऱयांचं झाड  

ज्यातून निनादत असतात  

षडज पंचमापासून भैरवीपर्यंतचे स्वर 

जाती-धर्माच्या विवक्षित प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करणाऱया पुस्तकांवर भाष्य करताना काही प्रश्नांबाबत कुतूहल असावे हे स्वाभाविकच, पण या प्रश्नांच्या मुळाशी काही संदर्भ असतात हे सांगण्यासाठी अनुभूतीलाही राजकीयदृष्टय़ा सृजनशील व्हावे लागते हेसुद्धा तितकेच अपरिहार्य असते.  ‘मोहाचे सरकते जिने’ या कवितेत आजच्या मध्यमवर्गीय घरात असणारी उच्चभ्रू संस्कृतीची फसवी आस आणि तिचे ताणेबाणे विशद करताना कवी एक अधोरेखित सत्य मांडून जातो.

कितीही गेलो उंचावर तरीही मनात बाळगून  

मोहाचे सरकते जिने  मिळत नाही आयुष्याला  

परिपूर्णतेची लिफ्ट, 

फक्त नावावर असण्यानं  

कुठं घेऊन जाता येतात वर  

आखीव-रेखीव स्क्वेअर फीट… 

तर ‘नोटिफिकेशन’ या कवितेतून आजच्या तांत्रिक प्रगतीने अनुभवाला येणारे वास्तवाचे विदारक सत्य मांडून तांत्रिक युगात मरणाचेही होऊ घातलेले तांत्रिकीकरण दाखवून देतो ते पुढील ओळींतून…

मिळताहेत लाईक्स, 

केल्या जाताहेत कमेंट्स 

मरणापूर्वी केलेल्या पोस्टला, 

फोनमध्ये पडतोय खच मेसेजचा  

पानांचा पडावा झाडाच्या मुळांशी तसा  

तसेच ‘विभक्त तर’ या कवितेतून कवी रक्ताच्या नात्यालासुद्धा तंत्रयुगात कसे विभक्त केले आहे हे जाणवून आपणच जगलेल्या सुशिक्षितपणातही एक निरक्षरता डोकावून आपल्याला डिवचते याचे प्रत्यंतर घडवून आणतो.

पाहतो मुलाला  

अपलोड केलेल्या  

फोटोतच मोठा होताना, 

त्याचं प्रगतीपुस्तक  

कधीच येत नाही सहीला  

फक्त ते दाखवतं वाकुल्या  

माझ्या सुशिक्षित निरक्षरतेला  

तंत्रज्ञान ाढांतीचे परिणाम म्हणून कवितेच्या निर्मिक आशयाचा विचार जरी केला तरी तिच्या परिणामाची तीव्रता ही जनमानसासाठी तीव्रच असायला हवी. तरच तिच्याद्वारे होणारे सकारात्मक बदल व परिणाम ठाशीव स्वरूपात नजरेत येतील व तेवढी परिपक्वता गीतेश यांच्या कवितेत आहे.  म्हणूनच ती कवितेच्या यशस्वीतेच्या व्यापकतेला अधिक उंचावर घेऊन जाईल हा विश्वास या कवितेतून मिळतो हे निश्चित. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत हरवलेला भावकवितेचा सच्चा सूरही या कवितांमधून ऐकू येतो.

सीसीटीव्हींच्या गर्द छायेत

कवी : गीतेश गजानन शिंदे 

प्रकाशक : शब्दालय प्रकाशन

पृष्ठे : 128, मूल्य : 250 रुपये