मिरवणारी डिग्री मेरीटची, की पेमेंटच्या सिटची? डॉ. अमोल कोल्हे यांचा डॉ. सुजय विखे यांना सवाल

भाषा येत नाही म्हणून कोणी टीका करत असेल तर मिरवणारी डिग्री ही मेरीटची की पेमेंटच्या सिटची हा निकष लावायचा का, असा सवाल शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना केला. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी बेलवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते.

कोल्हे म्हणाले की, एकीकडे पाच पिढयांचे राजकारण असताना एका सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा उभा रहतो. विचारावर विश्‍वास ठेवत लोकशाही टिकविण्यासाठी थेट आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार होतो हे महत्वाचे आहे. जेंव्हा योध्दा शस्त्र टाकत नाही, शरण येत नाही आणि जेव्हा तो घेरला जातो, तेव्हा त्याला बदनाम केले जाते अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता ही महत्वाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

खरे तर नगर दक्षिणमध्ये माझ्यावर टीका करण्याचे कारण नाही. तरीही टीका केली की अमोल कोल्हे घोड्यावर दिसले, संसदेत घोडयावर दिसले, महानाटयात घोडयावर दिसले. घोडयावर बसल्यावर तुम्हाल एवढा त्रास होतो. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो. आम्हाला कष्ट करावे लागतात. तेव्हा आमच्या घरातली चुल पेटते, यात आमचा दोष काय ? आमच्या पाच, पाच पिढया राजकारणात नाहीत. मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता, त्यावेळी रात्ररात्र अभ्यास करावा लागला. 97.33 टक्के मार्क मिळवावे लागले. आम्हाला कोणी पेमेंटची सिट खैरातमध्ये वाटली नाही. पदव्युतर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली. तुमच्या सारखे पेमेंट सिटमधून सरळ प्रवेश मिळाला नाही. कोणी आम्हाला सिट दिली नाही. जे केवळ मोठ्या घरात जन्म घेतल्याच् समाधान मिळते, त्यावरून तुम्ही टीका करत असाल तर त्याचे आम्हाला वाईट वाटत नाही. कारण 80 टक्के जनता आमच्यासारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि हिंमतीवर जगत असते, असेही डॉ. कोल्हे यांनी डॉ. सुजय विखे यांना सुनावले.

पुढाऱ्यांच्या हाती निवडणूक राहिली नाही
आम्ही 40 वर्षे निवडणूका पाहतोय. ही निवडणूक आमच्या पुढाऱ्यांच्या हातात राहिली नसून मतदारांनी हाती घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच चारशेच्यावर गावांमध्ये जाऊन तेथील प्रश्‍न त्यांनी समजून घेतले आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून अर्थकारण होणार आहे. मतांची ही रास सांभाळण्याची जबाबदारी आपणा सर्व कार्यकर्त्यांची आहे.
– बाबासाहेब भोस, ज्येष्ठ नेते

15 मे रोजी दुध, कांद्याच्या प्रश्‍नावर आंदोलन
13 मे रोजी मतदान झाल्यानंतर 15 मे रोजी आपण दूध व कांदा दरासाठी मोठे आंदोलन करणार आहोत. दरवाढ करा, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. दरवाढ करा, अन्यथा आम्हाला तुरूंगात टाका, अशी भूमिका घेत किमान एक लाख आंदोलक तुरूंगात जाणार असल्याचे निलेश लंके यांनी जाहीर केले.