सामना अग्रलेख – ‘अल्लाबक्ष’ प्रचारास निघाले!

एकच प्यालानाटकातीलआर्य मदिरा मंडळा होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनीखोटेछातीशी धरले आहे. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचेअल्लाबक्षभाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांचीआखरी मंजिलतीच आहे!

राज्याचे बेकायदा मुख्यमंत्री शिंदे यांचे अनधिकृत राजकारण 31 डिसेंबरनंतर संपणार आहे. खोक्यांचे वाटप करून सत्ता तर मिळवली, पण त्याच मार्गाने यापुढे सत्तेचा डोलारा टिकवता येणार नाही याची खात्री झाल्याने त्यांची मनःस्थिती ऐन दिवाळीत साफ बिघडली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची एक गंमत आहे. ते स्वतःला शिवसेनेचे नेते वगैरे समजतात. त्यांच्याबरोबर असलेल्या 40 आमदारांचे व 10-12 खासदारांचे टोळके म्हणजे शिवसेना असा त्यांचा दावा आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अशा अनेक टोळय़ा, टोळधाडी आल्या व नामशेष झाल्या. मिंधे टोळीचे तेच हाल होतील. तर गंमत अशी की, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे आता भाजपसाठी चार राज्यांत विधानसभा निवडणुकांचा प्रचार करणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांत भाजप विजयासाठी ठाण्यातील डुप्लिकेट सेना प्रचारात उतरणार ही गंमतच आहे. भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद पैशाच्या मस्तीत आहे. पैसा, सत्ता व तपास यंत्रणा यामुळेच भाजपचा जय होतो व तेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. विचार, धोरण वगैरे नगण्य आहे. त्यामुळे शिंदे यांचे चार राज्यांत प्रचाराला जाणे हे समजण्यासारखे आहे. शिंदे व त्यांचे टोळके चार राज्यांत प्रचारास जाईल, पण हेच लोक मुंबई, ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. ही सुद्धा गंमत आहे. शिंदे हे सुसंगत विचाराबाबत कधीच प्रख्यात नव्हते. मुळात

शिवसेनेचे विचार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजली नाही. म्हणूनच ते पाच राज्यांत भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत. श्री. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्कीच होते. वाजपेयी-आडवाणी यांनी दिल्लीची सत्ता सांभाळली. यासाठी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रातून भक्कम पाठिंबा मिळवून दिला, पण इतर राज्यांत जाऊन त्यांनी भाजपच्या पखाली वाहिल्या नाहीत. मात्र आज सगळाच नकली माल असल्याने नकली शिवसेनेची टोळी चार राज्यांत भाजपच्या प्रचारास चालली आहे. बरं, त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तरी काय असणार? मोदी-शहांची भलामण करणे व शिवसेना (नकली) तुमची बटीक आहे हे दाखवून देणे हाच त्यांचा प्रचाराचा धागा असेल. महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतात भाजपचा प्रचार करणार. त्यापेक्षा हे थेट भाजपात सामील का होत नाहीत? असा प्रश्न लोकांना पडला आहे. कै. राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक प्रख्यात आहे. तळीराम नावाचे एक अट्टल दारूबाज पात्र गडकऱ्यांनी या नाटकात रंगवले आहे. या तळीरामाने ‘आर्य मदिरा मंडळ’ नावाची दारूबाजांची एक संस्था निर्माण केलेली असते. वे.शा.सं. शास्त्रीबुवा व अल्लाबक्ष ही त्यातील दोन प्रमुख पात्रे. भरपूर दारू ढोसल्यानंतर या दोघांतील वैचारिक वादास तोंड फुटते. गंमत अशी की, दारूच्या नशेत ही दोन पात्रे आपल्या मूळ भूमिका विसरून उलट बाजू घेऊन भांडतात. शास्त्रीबुवा इस्लामची

थोरवी सांगतात

तर अल्लाबक्ष हिंदू धर्माची महती गातात. अर्थात, दारूच्या नशेत दाढीधारी शास्त्रीबुवा एक काम चोख बजावतात. अल्लाबक्ष यास ते, ‘‘शाब्बास, अल्लाबक्ष, आज तुम्ही हिंदू धर्माची लाज राखलीत!’’ अशी शाब्बासकी देतात. ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे हे नाटक आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत व ते भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. सत्य पायदळी तुडवून त्यांनी ‘खोटे’ छातीशी धरले आहे. मुख्यमंत्री शिंदय़ांची टोळी सध्या कोणत्या अवस्थेतून जात आहे? ते पाहायला हवे. त्यांच्या टोळीतील दोन प्रमुख लोक गजानन कीर्तिकर व रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप-प्रत्यारोप केले. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेशी पहिली गद्दारी व आता जेथे आहेत तेथे दुसरी गद्दारी. कीर्तिकर-कदम यांचे भांडण इतक्या टोकाला पोहोचले आहे की, बहुधा त्याच त्राग्याने मनःशांतीसाठी मुख्यमंत्री शिंदे चार राज्यांत प्रचारास निघाले आहेत. कीर्तिकर व कदम यांनी एकमेकांच्या गद्दारीचे ‘पुरावे’च जाहीर केले. त्यामुळे शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला. शिंदे कधी एखाद्या तीर्थस्थानी असतात तर अनेकदा दिल्लीचरणी. आता ते मन रमविण्यासाठी स्वतःला भाजपच्या प्रचारात गुंतवून घेत आहेत. नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही हे त्यांना वर्षभरात समजले हे बरे झाले. महाराष्ट्राचे ‘अल्लाबक्ष’ भाजपच्या प्रचारास निघाले आहेत. त्यांची ‘आखरी मंजिल’ तीच आहे!