सामना अग्रलेख – बंद करा बेशरमपणा!

जवान शहीद झाले की, त्यांच्या हौतात्म्याची किंमत लावायची व चेक कुटुंबास देताना ‘फोटो’ काढून प्रसिद्ध करायचे हा असा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. शहीद शुभम यांची माता चेक आणि फोटो नाकारत होती तरी योगी सरकारचे मंत्री ‘फोटो फोटो’ करीत राहिले. देशाला ‘पनौती’ लागली की, राज्यकर्त्यांची मती ही अशी भ्रष्ट होते. हुतात्म्यांच्या चिता जळत असतानाही जे राजकीय नफा-तोटय़ाचा विचार करतात त्यांना बेशरम म्हणणे हासुद्धा आता राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा ठरवला जाईल. कॅ. शुभम गुप्तांचे हौतात्म्य ही केंद्र सरकारची नामुष्की आहे व शुभम यांच्या घरी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्र्यांनी केलेला तमाशा हा बेशरमपणाचा कळस आहे! बंद करा ही नौटंकी, असा आकांत वीरमातेनेच केला आहे!

महाराष्ट्रात ‘भाजप’ म्हणजे भारतीय जुगार पार्टी झाली आहे, तर उत्तर प्रदेशात ‘बीजेपी’मधील ‘बी’ म्हणजे बेशरम आणि ‘पी’ म्हणजे पब्लिसिटी अर्थात स्वस्त प्रसिद्धी असे समीकरण बनले आहे. आग्रा निवासी कॅप्टन शुभम गुप्ता यांस कश्मिरी खोऱयात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले. कश्मीरात दोन कॅप्टनसह चार जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. पंतप्रधान मोदींसह संपूर्ण भाजप पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग असल्याने त्यांना शोक व्यक्त करणे जमले नाही, पण देश मात्र हळहळला. शुभम गुप्ता हे तरुण लष्करी अधिकारी होते. आग्रा येथील घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच कश्मीरात त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त घरी धडकल्याने त्यांचे माता-पिता साफ कोलमडून गेले. त्यांच्या आक्रोशाने आकाश थरारले, जमीन हादरली, पत्थरालाही अश्रू फुटले. त्याच वेळी उत्तर प्रदेशच्या हिंदुत्ववादी सरकारचे एक मंत्री योगेंद्र उपाध्याय हे 50 लाखांचा चेक घेऊन फोटोग्राफर, कॅमेरामनसह गुप्ता यांच्या आग्रा येथील घरी पोहोचले तेव्हा कॅ. शुभमची आई म्हणजे वीरमाता जवळ जवळ शुद्ध हरपून आक्रोश करीत होती. घरामध्ये आकांत, दुःखाचा उद्रेक सुरू असताना मंत्रीमहाशय कॅमेरा, फोटोग्राफरसमोर वीरमातेच्या हाती 50 लाखांचा चेक कोंबत होते व पह्टोग्राफरला प्लॅश मारण्यास सांगत होते. त्यावर ती वीरमाता बेहोशीच्या अवस्थेतही संतापली, ‘‘मंत्रीजी, ही नौटंकी आणि प्रदर्शन बंद करा. मला नको तुमचे पैसे. पैसे परत घेऊन जा आणि माझ्या मुलास परत आणा.’’ या आक्रोशानंतरही हिंदुत्ववादी सरकारचे मंत्री ‘फोटो’शूट करत राहिले यास काय म्हणावे? एक तरुण अधिकारी कश्मीरात

राष्ट्रकार्यासाठी वीरगतीस

प्राप्त होतो व त्याच्या हौतात्म्याचा फायदा राजकारणी प्रसिद्धीसाठी घेतात. गुप्ता यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव घरी येण्याआधीच 50 लाखांचा सरकारी चेक घेऊन घरी जाण्याचे कारण नव्हते. दुःखाचा भर ओसरल्यावरही हे उपचार करता आले असते. एवढेही भान सध्याच्या नवहिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना नसावे? कॅ. शुभम गुप्तांना प्राण का गमवावे लागले? पेंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे कश्मीरात असंख्य शुभम हौतात्म्य पत्करीत आहेत. पुलवामातील जवानांचे हत्याकांड हासुद्धा सरकारचा नाकर्तेपणाच होता. पुलवामात एकाच वेळी चाळीस ‘शुभम’ मारले गेले होते व आता रोज एक-दोन शुभम वीरगतीस प्राप्त होत आहेत, पण सरकार ना ‘पुलवामा’ रोखू शकले, ना शुभमसारख्या तरुण अधिकाऱयांचे प्राण वाचवू शकले. मोदी सरकार दंग आहे ते प्रचारात. शिवाय शहीद शुभम गुप्ता यांची वीरमाता शोकमग्न असताना त्याचा विचार न करता 50 लाखांची मदत देण्याचा बेशरमपणा भाजपच्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी केला. पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपने असाच बेशरमपणा केला होता. पुलवामा शहिदांचे ‘फोटो’ आणि अस्थिकलश फिरवून मते मागण्याचा जाहीर कार्यक्रम तेव्हाही झाला. तेव्हा चाळीस जवान होते, आता चार आहेत इतकेच, पण भूमी तीच आहे, जेथे रोज आपले जवान शहीद होत आहेत. जवान शहीद झाले की, त्यांच्या हौतात्म्याची पिंमत लावायची व चेक कुटुंबास देताना ‘‘फोटो’ काढून प्रसिद्ध करायचे हा असा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. शहीद शुभम यांची माता चेक आणि फोटो नाकारत होती तरी योगी सरकारचे मंत्री ‘फोटो फोटो’ करीत राहिले. हा त्या हौतात्म्याचा अपमान आहे. देशाला ‘पनौती’ लागली की,

राज्यकर्त्यांची मती

ही अशी भ्रष्ट होते. पंतप्रधानांपासून त्यांच्या देशभरातील मंत्र्यांना एखाद्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त फोटो प्रसिद्धीचा उत्सव साजरा करायचा आहे. कामाचे नाव नाही, फक्त प्रसिद्धीचाच सोस यांना जडला आहे. जाहिरातबाजी आणि फोटोबाजीशिवाय देशात दुसरे काय घडत आहे? अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारताने विश्वचषकाची लढाई हरली, पण भारत विश्वचषक जिंकला असता तर पंतप्रधान मोदी हातात विश्वचषक उंचावून कप्तान रोहित शर्मासह संपूर्ण स्टेडियमला उघडय़ा जीपमधून फेरफटका मारणार होते. गुजरातसह संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्ष विश्वचषक जिंकण्याचे श्रेय मोदींनाच देणार होता व त्या प्रसिद्धीची जोरदार तयारी आधीच झाली होती. राजस्थान वगैरे राज्यांत तर या विजयाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी होणार होता, पण आपण पराभूत झालो व उत्सवाचे सगळेच राजकीय मुसळ केरात गेले. शहीद कॅ. शुभम यांच्या वीरमातेला मदत देण्याचा भाजपवाल्यांनी ‘इव्हेंट’ केला. तिकडे कश्मीरमध्येच शहीद झालेले दुसरे कॅप्टन एम. व्ही. प्रांजल यांचे पार्थिव शनिवारी बंगळुरू येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते आणि पंतप्रधान मोदी ‘तेजस’ या लढाऊ विमानातून ‘विहार’ करीत होते. कॅ. शुभम गुप्तांच्या बाबतीत जे घडले तेच ‘पुलवामा’ व क्रिकेट विश्वचषकाच्या बाबतीत घडणार होते. हुतात्म्यांच्या चिता जळत असतानाही जे राजकीय नफा-तोटय़ाचा विचार करतात त्यांना बेशरम म्हणणे हासुद्धा आता राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा ठरवला जाईल. कॅ. शुभम गुप्तांचे हौतात्म्य ही केंद्र सरकारची नामुष्की आहे व शुभम यांच्या घरी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्र्यांनी केलेला तमाशा हा बेशरमपणाचा कळस आहे! बंद करा ही नौटंकी, असा आकांत वीरमातेनेच केला आहे!