मोदींची निवडून यायची गॅरंटी नाही, मग जनतेला कसली गॅरंटी देतात; संजय राऊत यांचा टोला

देशात मोदींची अजिबात लाट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप 400 पारच्या दाव्याची खिल्ली उडवली.

नरेंद्र मोदी यांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोलले पाहिजे. सभेमध्ये ते जी भाषा बोलतात, तशी गल्लीतील लोकंसुद्धा बोलत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या, परिवर्तनाची सुरुवात ही विदर्भातून होते. मोदींनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला.

फडणवीस यांना आकडे लावण्याची सवयच

देवेंद्र फडणवीस ‘45 पेक्षा अधिक’ सांगत आहेत. त्यांचे आकडे काहीही असू द्या. त्यांना आकडे लावण्याची सवयच आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल. महाराष्ट्रात आम्हाला 35 अधिक आणि देशात 305 जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 प्रभुराम पळपुटय़ांच्या मागे राहत नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ ंिशदे यांना रामटेकातील त्यांचा उमेदवार बदलावा लागला. ते विद्यमान खासदाराला तिकीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना रोड शो घेऊ द्या की सभा, त्यांच्या हाती काहीही पडणार नाही. मुख्यमंत्र्यांचे रामप्रेम खोटे आहे. कोणत्याही लढय़ात व संघर्षात ते नव्हते. प्रभुराम पळपुटय़ांच्या मागे राहत नाहीत. जे आत्मविश्वासाने लढतात त्यांच्यासोबत प्रभुराम असतात, असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदा करतील. देशदेखील व्यापारीच चालवत आहेत. त्यांचे एजंट अजित पवार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अगदी बरोबर बोलल्या आहेत. देशात मोदींची लाट नाही. मोदी लाटेवर त्यांचेच उमेदवार निवडून येणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

सांगलीमध्ये काँग्रेस अपक्ष का लढत आहे हे माहीत नाही. जर कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल तर कारवाई केली पाहिजे. पक्षाचा नेता शिस्तभंग करत असेल तर पक्षाने त्याची हकालपट्टी करावी, असे संजय राऊत म्हणाले.