बुलढाण्यात दोन खासगी बसेसच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

काहीदिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा दोन खासगी बसेसचा अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्हातील मलकापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर मुंबई हायवे क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक झाली. लक्ष्मीनगर उड्डाणपुलावर सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एम.एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री प्रवास करत होते. तर नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवासी होते. मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 6 वर या बसेसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बसचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही बस मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरू केले. घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे पुन्हा खळबळ उडाली असून खासगी बसच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.