पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात राज्यव्यापी आंदोलन

राज्यभरात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली दिरंगाई याचा निषेध म्हणून राज्यातील पत्रकारांच्या 11 प्रमुख संघटनांचे पत्रकार गुरुवार, 17 ऑगस्टला प्रत्येक शहरात निदर्शने करणार असून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करणार आहेत. दरम्यान, मुंबईत दुपारी 12 वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन केले जाणार आहे.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अर्वाच्य शिवीगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारांवर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात. 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास 200 पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिवीगाळ केली गेली किंवा त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणांतच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला. कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.  तालुका आणि जिल्हास्तरावर कलेक्टर ऑफिस किंवा तहसील कार्यालयासमोर किंवा शहरातील मध्यवर्ती चौकात हे आंदोलन करावे, असे आवाहन पत्रकारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.