EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, तर जबाबदारी पार पाडतो! एका प्राध्यापकाचा आयोगाकडे विनंती अर्ज

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

सर्वप्रथम EVM मशीन 2004 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वापरल्या गेली. वेळोवेळी या ईव्हीएम मशीन बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेले. नेमके हेच प्रश्न चिन्ह उपस्थित करीत अमोलकचंद महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने आपण ‘EVM’ ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत’ असं पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलं. प्राध्यापकाच्या या मागणीमुळे निवडणूक अधिकारीही चक्रावले आहेत. हे पत्र समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल झालं आहे. काही जणांनी त्यांचं कौतुक केलं तर काही जणांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. सागर शेवंतराव जाधव यांची 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून ड्युटी लागली. तसं पत्र प्रशासनानं 14 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांना पाठविलं. जगातील सर्वात महान लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक महोत्सवात सहभागी होणं ही देशाच्या नागरिकासाठी गौरवाची बाब आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. डॉ. सागर जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले. आपण 2004 पासून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सातत्याने निवडणूक ड्युटी करत आहो, असेही नमूद केले. मात्र आज देशभरात ईव्हीएम विरोधात वातावरण तयार झालेले आहे. देशातील लोकशाहीसाठी ईव्हीएम प्रणाली घातक ठरणारी आहे, असं जनमानस बनले असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचंही ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. देशाचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते ईव्हीएम विरोधात बोलत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांत प्रसारित झाला आहे. ज्या प्रगत राष्ट्रांनी EVM चा शोध लावला ते राष्ट्रसुद्धा निष्पक्षपणे निवडणूक पार पाडण्यासाठी EVM चा वापर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेत आहेत, आदी मुद्दे मांडले. तंत्रज्ञानामुळे अवकाशातील यान पृथ्वीवरून नियंत्रित करता येते. बँक खाते हॅक करून गैरव्यवहार करता येतो. त्याचप्रमाणे EVM सुद्धा हॅक केले जावू शकते, याचे प्रात्यक्षिक अनेकांनी संवैधानिक मार्गांनी सिद्ध केलेले आहे. त्यामुळे EVM द्वारा घेतल्या जाणाऱ्या निवडणुका लोकशाहीसाठी अविश्वासार्ह असल्याचे, प्रा. डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.

देशाचा एक नागरिक म्हणून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधान अनुच्छेद 19 (1) (अ) द्वारे EVM च्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास असहमती नोंदवित असल्याचे त्यांनी प्रशासनास कळविलं. मात्र EVM ऐवजी बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया घेत असल्यास आपण सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचेही डॉ. सागर जाधव यांनी स्पष्ट केलं.

आपण प्रशासनाकडे आपलं म्हणणं मांडलं. आवक-जावकमध्ये पत्र दिलं. तेथील अधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नाही. निवडणूक आयोगच याबाबत निर्णय घेईल, असं सांगितल्याचे प्रा. डॉ. सागर जाधव यांनी सांगितलं. प्रशासनास पत्र दिल्याबाबत महाविद्यालयाकडून विचारणा झाल्याचेही डॉ. जाधव म्हणाले.