भाजप-मिंधे महाराष्ट्राचा द्वेष का करतात? नायर हॉस्पिटल डेंटल क्लिनिकवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजप-मिंधे प्रणित सरकारच्या कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सडेतोड टीका केली आहे. आचार संहितेपूर्वी मिंधे प्रणित सरकारने घाईघाईत नायर हॉस्पिटल डेंटल क्लिनिकचं उद्घाटन केलं होतं. पण, त्यातील सोयीसुविधांकडे मात्र सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आपल्या एक्स पोस्टवरून त्यांनी मिंधे सरकारवर टीका करून नायरकडे लक्ष वेधलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या पोस्टनुसार, भाजप प्रणित मिंधे राजवटीने १५ मार्च २०२४ ला आचारसंहितेपूर्वी अत्यंत घाईगडबडीत ‘नायर हॉस्पिटल डेंटल क्लिनिकच्या’ नवीन वसतिगृहाचं धूमधडाक्यात उद्घाटन केलं. मात्र, जवळपास १० दिवस वसतिगृहात वीज आणि पाणी नाहीये. फायर अलार्म काम करत नाहीत. गेल्या आठवड्यात आग लागली, सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, पण काही खोल्या पूर्णपणे जळून खाक झाल्यात. तिथे पुरेसे फायर प्रोटोकॉल पाळले आहेत का?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

तसंच, विद्यार्थ्यांच्या मते कॅन्टीनमध्ये भयानक निकृष्ट अन्न दिलं जातंय. सुरक्षेच्या उपाययोजना करूनही निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचे फोन चोरीला जात आहेत. रात्रीच्या वेळी कोणीही बाहेरची अनोळखी व्यक्ती बिनधास्त आत येऊ-जाऊ शकतेय. विद्यार्थ्यांचा विरोध, आक्रोश घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि बीएमसीला ऐकू जात नाहीये का? मिंधे गॅंग भाजपसोबत आपल्या जागांच्या वाटाघाटी आणि घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहे… त्यांना फक्त होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून उद्घाटनाची नाटकं करणं हवं असतं! भाजप आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात?, असा सडेतोड प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.